पुणे:”आम आदमी पक्ष विसर पडलेल्या हक्कांची जाणीव सर्वसामान्य लोकांना करून देत आहे. नगरसेवक म्हणजे सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेला नोकर असतो. हा नोकर जर काम करत नसेल तर मालकाला पुढे यावे लागेल आणि नोकराच्या खुर्चीत बसावे लागेल. म्हणूनच ‘आपणच होऊ नगरसेवक’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे”, अशा शब्दांमध्ये आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
बालगंधर्व रंगमंदिरात आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विजय कुंभार बोलत होते. ‘भ्रष्टाचार संपवणार,आम आदमीचे सरकार’ ही मेळाव्याची प्रमुख संकल्पना होती.
सभागृहातील प्रचंड गर्दीचा उल्लेख भाषणात करून कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कुंभार पुढे म्हणाले की, ” या गर्दीचे सांगणे असे आहे की आता आम्हाला पुण्यामध्ये आम आदमी पक्ष हवा आहे. ‘नाही रे ‘ वर्गाला आपल्या हक्कांची मुळीच जाणीव नाही. त्यांना हक्कांचा विचार करण्यासाठी वेळच मिळू नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली गेली आहे.अशा ‘नाही रे’ वर्गासाठी आता आपल्याला मैदानात उतरावे लागेल.”
या मेळाव्यात रिक्षाचालकांपासून दुकानदार, डॉक्टर, इंजिनीयर, वकील, निवृत्त न्यायाधीशांपर्यंत शेकडो कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रेक्षागृहा बाहेरही अनेक आम आदमी कार्यक्रम ऐकत उभे होते. ‘आम आदमी पार्टीचा झाडू फिरवू ,भ्रष्टाचार साफ करू’ हा मुद्दा वक्त्यांनी मांडला. भ्रष्टाचार मुक्त सुशासन आणि विकासाचे दिल्ली नव्हे तर त्याहून प्रगत पुणे माॅडेल या मुद्याला पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये साथ दिली.
यावेळी पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुणे राज्य प्रवक्ते डॉ.अभिजीत मोरे, राज्य वाहतूक विंगचे अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या तारा मैत्रेयन, जेष्ठ कार्यकर्ते किशोर मुजुमदार, खडकवासला विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी गायकवाड, आम आदमी रिक्षचालक संघटनेचे अध्यक्ष असगर बेग, निवृत्त न्यायाधीश मंजुषा नयन, क्षेत्रीय कार्यालय निहाय अध्यक्ष – सुदर्शन जगदाळे, रोहन रोकडे, अनिल धुमाळ, किरण कांबळे, सतीश यादव, सुशील बोबडे, घनश्याम मारणे, नरेंद्र देसाई, मनोज फुलावरे आदी व्यासपीठावर होते.
आपचे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि पारंपरिक राजकीय पक्षांनी चालविलेल्या उघड भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. बोगस अभियंता पदोन्नती घोटाळा, कचरा घोटाळा, किमान वेतन घोटाळा, मालमत्ता सर्वेक्षण घोटाळा, जम्बो हॉस्पिटल ठेक्यामधील भ्रष्टाचार, समान पाणी पुरवठा योजना या फसव्या योजनेत खर्च होणारे अडीच हजार कोटी, फुगत चाललेला जायका प्रकल्प तसेच कोरोनाच्या काळात धूळ खात पडून असलेली महानगरपालिकेची रुग्णालये अशा मुद्यांकडे लक्ष वेधले.
डॉ. मोरे यांनी स्मशानभूमीचे होऊ घातलेले खाजगीकरण, बोलकी झाडे, लाखो – करोडो रुपयांचे झाडांविषयी झालेले भ्रष्टकारण आदी अनेक मुद्द्यांचा उहापोह केला. 125 एकर क्षेत्र असलेल्या 270 अॅमिनिटी स्पेस नामक मोकळ्या जागा 90 वर्षांच्या करारावर विकत देण्याचा भाजपचा आम आदमी पार्टीने हाणून पाडलेला डाव यावरही भाष्य केले.
जेष्ठ कॅलिग्राफीतज्ञ प्रभाकर भोसले यांनी विकासाचे दिल्ली मॉडेल सविस्तर प्रेझेंटेशन करून सर्वांना समजावून सांगितले. पुण्यात याच धर्तीवर बदल करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
आप वाहतूक विंगचे राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य यांनी कराचा पैसा हा धोरणात्मकपणे कसा लुटला जातो, सामान्य लोक कसे ठगवले जातात याबाबत सविस्तर मांडणी केली. ही परिस्थिती बदलण्याचे आवाहन केले. तसेच परिवर्तनाच्या या लढाईत रिक्षाचालक, टेम्पोचालक आम आदमी पक्षासोबत नेटाने उभे राहतील याची ग्वाही दिली.
आप पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर यांनी “पुणे मनपाची निवडणूक आपल्याला केवळ लढवायची नाही तर जिंकायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी जीवाचे रान करुन कष्ट करण्याचे” जोशपूर्ण आवाहन केले.
शहरातील सर्व 173 जागा लढवण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. ‘आपणच होऊ नगरसेवक’ मोहिमेतील इच्छूकांपैकी इंजिनियर सुदर्शन जगदाळे, रिक्षाचालक किरण कांबळे, डॉक्टर प्रेरणा बनसोडे , गृहिणी सना शेख, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती ताकवले, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी गायकवाड, निवृत्त जवान संतोष चौधरी, व्यावसायिक राहुल म्हस्के, अॅड. दत्तात्रय भांगे, माजी न्यायाधीश मंजुषा नयन आदींनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, पुणे शहर रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांच्या 12 कोविड विधवांना परमिट हस्तांतरणाचा कार्यक्रम संयोजकांच्या हस्ते पार पडला.
प्रामाणिकपणा दाखवून समाजाला आदर्श घालून देणाऱ्या 9 जणांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सर्व रिक्षा चालकांचा प्रातिनिधिक म्हणून अशोक शिंदे व सुरेश पारखी यांचा सत्कार करण्यात आला.
आनंद अंकुश यांनी सूत्र संचालन केले. तर विद्यानंद नायक यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केलेल्या पक्ष व आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.