मुंबई, दि. १४ मे – वर्षभरातील कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबई काय, गाव काय सर्व ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अशावेळी राज्यात वैद्यकीय औषधांचा तुडवडा भासत असल्याने रुग्णांच्या कुटुंबियांची धावाधाव सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला झुकतं माप दिलं, तरीही राज्य सरकार मात्र सातत्याने केंद्रावर टीका करत आहे. संकट काळात मदत म्हणून पी एम केयेर फंड मधून देण्यात आलेले ४०० व्हेंटिलेटर वापरण्यात आले नसून धूळ खात असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
कोरोना काळात राज्यात परिस्थिति गंभीर असताना वैद्यकीय औषधाचा तुडवडा मोठ्या प्रमाणावर भासत असून त्यावर दरेकर म्हणाले की, पी एम केयेर फंड मधून देण्यात आलेले ४०० व्हेंटिलेटर न वापरणे हे राज्याला या गंभीर परिस्थितीमध्ये शोभा देणारं नाही आहे. तसेच व्हेंटिलेटर खराब असल्याकारणामुळे वापरत नसल्याचे स्पष्टीकरण सरकार करत असून दरेकर म्हणाले, काही अंशी ते खराब ही असू शकतील. पण त्याकरिता ४०० व्हेंटिलेटर न वापरणे यात काय अर्थ? असा सवाल करत फक्त पी एम केयर फंड मधुन व्हेंटिलेटर आले म्हणून वापरले नाही अशी शंका उपस्थित करत अशा पद्धतीचे घृणास्पद राजकारण महाविकास आघाडी सरकारने करू नये, अशी विनंती दरेकर यांनी केली आहे.
फोन टॅप प्रकरणाच्या मुळाशी जावे
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ साली फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती आपल्याला खाजगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून दरेकर म्हणाले, कुणाचे ही फोन टॅप होणे योग्य नाही. नाना पटोले यांचे फोन टॅप होत असतील तर या संदर्भातली माहिती द्यावी. जर असे काही खरचं झाले असेल तर या सर्व प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. फक्त नाना पटोले यांनी हे प्रकरण एक दिवसाच्या बातमी पुरतं न ठेवता या प्रकरणाच्या मुळाशी जावे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.