कोल्हापूर- ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’ यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी(८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कुलकर्णी हे मुळचे पैठणचे. त्यांच्याकडे कुलकर्णीपदाचे वतन होते. दादा कोंडके यांच्या सुरूवातीच्या काळात गोविंद कुलकर्णी आणि त्यांच्या भट्टी चांगली जमली होती. यातूनच मग वरील दोन चित्रपटांबरोबरच बन्या बापू, अशी रंगली रात्र, अंगार, शपथ तुला बाळाची, मर्दानी, दैवत अशा चित्रपटांची कुलकर्णी यांनी निर्मिती केली. चित्रपट व्यवसायात आल्यानंतर कोल्हापूर हीच कर्मभूमी मानून ते येथेच वास्तव्य करू लागले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. गंगोत्री हॉस्पिटलचे डॉ.चारूहास भागवत यांच्यासह दोन मुले, पत्नी,सुना, नातवंडे असा त्यांच्या पश्चात परिवार आहे.
महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, निर्माते, दिग्दर्शक यशवंत भालकर, बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.