नागपूर- राष्ट्रवादीचे बडे तीन नेते असलेले अजित पवार, सुनील तटकरे यांची जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी तर छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी चौकशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परवानगी दिली.
लाचलुचपत विभागाने या तिघांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित फाईल्सच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागितली होती. अखेर फडणवीस यांनी आज ती परवानगी देऊन टाकली आहे. दरम्यान, या त्रिकुटाच्या चौकशीला परवानगी दिली असली तरी त्यांची चौकशी कधी व कशी होणार याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सरकारने आम्हा सर्वांची खुशाल चौकशी करावी. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही चौकशीला सामोरे जावू असे म्हटले आहे.
भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या भ्रष्टाचाराविरोधात प्रचार करून दमदार यश मिळविले. विधानसभेतही भाजप सत्तेवर आला. मात्र, भाजपकडे बहुमत नसल्याने भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता. त्यामुळे भाजपवर राज्यभरातून सडकून टीका झाली होती. ज्या लोकांच्या विरोधात आरोप करून तुम्ही सत्तेत आला त्यांचाच पाठिंबा घेऊन भ्रष्टाचारुमुक्त सरकार कसे चालवणार असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यामुळे प्रथम शिवसेनेला सत्तेत सामील करून घेण्यास नकार देणा-या भाजपने जनतेचा रोष दिसताचा महिन्याच्या आतच शिवसेनेला सत्तेत सामील करून घेतले. शिवसेनेला सरकारमध्ये सामील करून घेतल्यानंतर 8 दिवसातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांच्या चौकशीला परवानगी दिली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आहेत. कोर्टातही याबाबत याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे कोर्टाने या नेत्यांची चौकशीला परवानगी दिली आहे. त्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिघांच्या चौकशीला परवानगी दिली आहे. राज्याचा लाचलुचपत विभाग या तिघांची चौकशी करेल. मात्र, ही चौकशी कधी व कशी होणार याबाबत कोणतेही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मात्र, सरकारने कोर्टात जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात या तिघांच्या चौकशीला परवानगी दिल्याचे म्हटले आहे.