विश्वचषकातील सामन्यांत पाकिस्तानच्या विरोधात शतक करणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 126 चेंडूमध्ये 107 धावा केल्या. कोहलीने ही खेळी करताना दोन शतकी भागीदारी केल्या. त्याच जोरावर भारताला 300 धावांचा टप्पा गाठण्यात यश मिळाले.भारताच्या तरुण तडफदार विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करत शतक पूर्ण केले. या शतकाच्या बळावरच भारताने 300 धावांचा डोंगर उभा केला. विराटच्या या खेळीने मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकरचा विक्रमही मोडित निघाला आहे.
विराट कोहलीचे दमदार शतक, शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी अर्ध शतकं झळकवल्याने भारताने ३०० धावांचा टप्पा गाठला. पाकिस्तानसमोर भारताने ३०१ आव्हान ठेवलं होतं. पण पाकिस्तानला भारताने २२४ धावांवारच गुंडाळलं. विजयासाठी पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाहने अटोकाट प्रयत्न केले. पण तोही ७६ धावांवर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ लवकरच तंबूत परतला.
भारताने वर्ल्डकपमध्ये लागोपाठ सहाव्यांदा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. १९९२ मध्ये ४३ धावांनी, १९९६ मध्ये ३९, १९९९ मध्ये ४७, २००३ मध्ये ६ गडी राखून, २०११ मध्ये २९ धावांनी आणि आता ७६ धावांनी पाकिस्तानचा पराभव करत भारताने इतिहास कायम ठेवला.
भारताच्या 301 धावांच्या आव्हानापुढे पाकिस्तानची सुरवात खराब झाली. मोहंमद शमीने उसळत्या चेंडूवर सलामीवीर युनूस खानला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर अहमद शहजाद व हॅरिस सोहेल यांनी अर्धशतकी (68 धावा) भागिदारी करत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. जलदगती गोलंदाज अपयशी ठरत असल्याचे पाहून कर्णधार धोनीने फिरकीपटूंना गोलंदाजीस आणले. धोनीचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. आर. आश्विनने सोहेलला 36 धावांवर स्लीपमध्ये रैनाकरवी झेलबाद केले. शहजादने कर्णधार मिस्बाच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, उमेश यादवच्या गोलंदाजीवर पॉईंटवर उभ्या असलेल्या जडेजाने शहजादचा सुरेख झेल टिपला. शहजाद 47 धावांवर बाद झाला. त्याच षटकात उमेश यादवने शोएब मकसूदला भोपळाही न फोडता स्लीपमध्ये झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर उमर अकमलला धोनीने झेलबाद केले. धोनीने हा निर्णय तिसऱ्या पंचांवर सोपविला होता. अखेर तिसऱ्या पंचांनीही अकमलला बाद ठरविले. त्यानंतर वाहब रिसाझही धोनीकडे झेल देऊऩ बाद झाला. कर्णधार मिस्बाने 76 धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण, पाकिस्तानचा एकही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही. अखेर पाकिस्तानचा डाव 224 धावांत संपुष्टात आला. भारताकडून मोहंमद शमीने चार बळी घेतले.
भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि धोनीचे आक्रमक नेतृत्व या आधारे भारताने सहजरित्या पाकला नमवले आज वर्ल्डकपमध्ये भारत व पाकिस्तान सहाव्यांदा आमने सामने होते. या सहाही सामन्यांमध्ये भारतालाच विजय मिळाला आहे.