पुणे –
बहुचर्चित असणारा आणि अनेक पुरस्कार पटकावणारा एशियन एण्टरटेन्मेण्ट निर्मित ‘अवताराची
गोष्ट’ हा सिनेमा नाताळ (ख्रिसमस)च्या सुटीचे विशेष आकर्षण ठरणार आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी
संपूर्ण महाराष्ट्रातील थिएटर्समध्ये आपल्याला ‘अवताराची गोष्ट’ अनुभवता येऊ शकेल.
झी गौरव २०१४ च्या दिमाखदार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संवाद
आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री हा पुरस्कार लीना भागवतने पटकावला. इतकंच काय तर, ५१
व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट
संवाद या पुरस्कारांवर मोहोर उमटवून आणखीन मानाचा तुरा खोवला गेला. इतकंच काय तर
सह्याद्री सिने पुरस्कार २०१४मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार
या पुरस्कारांवर नाव कोरण्याची किमया या सिनेमाने केली आहे.
अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांना ज्याच्या आवाजाने एक जान आणली अशा रोहित श्याम राऊतसारख्या
लिटिल चॅम्पने आता एक नव्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे ते म्हणजे संगीताचा साज चढवण्याचा…
त्याचा साथीदार श्रीधर मेनन सोबत त्याने पहिल्यावहिल्या गाण्याला चाल देऊन अवताराची गोष्टसाठी
दणक्यात प्रमोशनल गाणं केलं आहे.
डोक्याचं झालंय भजं… अशा शब्दात रचलेलं हे प्रमोशनल गाणं आहे… त्यावरून ते किती धमाकेदार असेल अन्
त्यामधला अंदाज शब्दांवरून आला असेल, पण त्याला लाभलेली सूरावटही तितकीच मस्त आहे. दिग्दर्शक
नितीन दीक्षितमधला कवी – गीतकार आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. शरयू दाते, सिद्धी लोकरे अन्
रोहित श्याम राऊत यांनी ते तितक्याच दमदारपणे गायलं आहे. या गाण्यासाठी संगीत संयोजन केलं आहे ते
युगंधर देशमुखने.
याप्रसंगी दिग्दर्शक नितीन दीक्षित म्हणाले की, हा सिनेमा भाष्य करतो तो दोन मित्र अन् एका ठराविक
परिस्थितीत त्यांच्या वागण्या बोलण्यावर… त्यांच्या प्रतिक्रियेवर. आपल्या जगाकडे लहान मुले कशी
बघतात… त्यामधून ते त्याचं भावविश्व… कल्पनाविष्कार अन् विस्तार हा कशाप्रकारे करतात… या गाण्याची
रचना करताना सिनेमातील प्रमुख पात्रांचा विचार हा प्रामुख्याने केला गेला. सिनेमातील व्यक्तिरेखांभोवती हे
गाणं गुंफले गेले आहे. माझ्या या शब्दांना सुरेखपणे न्याय दिला आहे तो रोहित अन् श्रीधर यांनी. उत्साहाने
रसरसलेलं अन् प्रचंड ऊर्जा देणारं असं ठेका धरायला लावणारं हे गाणं वेगवेगळया वयोगटाला आपलेसे वाटेल.
या सिनेमाची कथा फिरते ती लहान मुलांच्या भावविश्वाभोवती. त्यांच्या कल्पनाविष्काराभोवती. रूपेरी
पडद्यावर पदार्पण करणारा मिहिरेश जोशी (सिनेमातील व्यक्तिरेखेचं नाव कौस्तुभ) आणि य़श
कुलकर्णी (म्हणजे सिनेमातील व्यक्तिरेखेचे नाव मंग्या). ती दशावतारमयी जगातील कल्पनाविश्वात
सुरस चमत्कारिक अन् साहसी जगात रममाण झालेले हे दोन चिमुरडे आणि त्यांच्या भावविश्वाची ही
कथा आहे. इथल्या प्रत्येक कलावंताने सिनेमाला चार चाँद लागेल, असं परफॉर्मन्सचे नाणे
खणखणीतपणे या सिनेमात वाजवले आहे. या सिनेमातील प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे, सुलभा
देशपांडे, सुनील अभ्यंकर, लीना भागवत आणि रश्मी खेडेकर आपल्याला दिसतील, एका विशेष
भूमिकेत प्रतिभावंत कलाकार आशिष विद्यार्थी आपल्याला झळकताना दिसेल.
या सिनेमाच्या लेखन अन् दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे नितीन दीक्षितने. कथा, पटकथा अन्
संवादांचे काम अतिशय संवेदनशील पद्धतीने नितीन दीक्षितने हाताळलेले आहे. सिनेनिर्मितीची
जबाबदारी सचिन साळुंखेने उचलली आहे. सिनेमॅटोग्राफी नागराज दिवाकरने सांभाळली असून मयूर
हरदासने संकलक म्हणून तर गंधारने संगीत दिले असून शान आणि जसराज यांच्या सुमधुर
आवाजातील ही गाणी श्रवणीय झालेली आहेत.