इस्लामाबाद-पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याला भारतच जबाबदार असून त्यांचा बदला घेण्यात येईल, अशी वक्तव्ये
पाकमध्ये दहशतवादाची बीजे पेरणारा दहशतवादी हाफीज सईदने केली आहेत पेशावरमधील ‘आर्मी स्कूल’मध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतालाच जबाबदार धरले आहे. सईद मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यानंतर पाकच्या पाठिशी भारत ठामपणे उभा राहिला असताना, त्याच्या या वक्तव्याचा एकाही पाकिस्तानी नेत्याने निषेध केला नाही, हे विशेष! सईदच्या लष्कर-ए-तोयबावर पाकमध्ये बंदी असली तरी त्याचा वावर खुलेआम आहे.
दहशतवादाला आजवर खतपाणी घालणारा पाकिस्तान मंगळवारचा कोवळ्या जिवांचा आक्रोश ऐकल्यानंतर खडबडून जागा झाला असून दहशतवाद संपवण्यासाठी आठवड्याभरात ‘नॅशनल प्लॅन’ जाहीर करणार असल्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी जाहीर केले. पाकिस्तानातील शेवटचा दहशतवादी संपपर्यंत दहशतवादाविरोधातील लढा सुरू राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शरीफ यांनी दहशतवादी गुन्ह्यांमधील फाशीच्या शिक्षेवर घालण्यात आलेली देशांतर्गत बंदी उठविली असून, दहशतवाद अथवा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यास त्यांनी बुधवारी मंजुरी दिली. सर्व पक्षीय बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
तालिबान्यांचा म्होरक्या मुल्लाह फझल्लुहचा ताबा मिळावा, यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी बुधवारी तातडीने अफगाणिस्तानकडे धाव घेतली. शरीफ यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घानी यांच्याशी बातचीत केल्यानंतर राहील काबूलला गेले.
पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी तेथील राज्यकर्ते, राजकीय नेते, लष्कर यांना धारेवर धरले आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कट्ट्ररतावाद रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, अशी थेट टीका ‘द नेशन’ या वृत्तपत्राने केली आहे. ‘पाकिस्तानने आपले अनेक शूर सैनिक गमावले, तरीही लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ यांनी कट्टरवाद्यांना पांघरूण घातले आहे. पाकिस्तानी तालिबानींना नेस्तनाबूत करण्यासाठी लष्कराने मोहिमा आखल्या; परंतु अफगाण तालिबानसारख्या धर्मांध किंवा ‘जमात उद दवा’सारख्या जिहादी संघटनांना संरक्षण दिले. गेल्या दशकभरापासून देशाने जे बीज पेरले आहे, त्यालाच आज ही फळे आली आहेत,’ असा घरचा आहेरही त्यात देण्यात आला आहे.