इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सची बैठक संपन्न
मुंबई : ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शाश्वत विकासासाठी जर्मन कंपन्यांनी योगदान द्यावे. जर्मन कंपन्यांनी औद्योगिक क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
हॉटेल ताज विवांता येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सची 59 वी वार्षिक बैठक संपन्न झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. भारतातील जर्मनीचे राजदूत डॉ. मार्टीन नाय, बॉश कंपनीचे व्यवस्थापकीय सहसंचालक सौमित्र भट्टाचार्य, आयजीसीसीचे अध्यक्ष तपन सिंघल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेच्या माध्यमातून जर्मन कंपन्यांनी देशात विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. जर्मन कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आज भारत देश जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता बनू पाहत आहे. देशाची जवळजवळ 50 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षाखालील आहे. या लोकसंख्येला मानव संसाधनात रुपांतरित केल्यास देश हा नक्कीच जागतिक पातळीवर आर्थिक महासत्तेचे शिखर गाठू शकेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
देशाच्या जीडीपीत राज्याचा वाटा 15 टक्के आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी जर्मन कंपन्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
राज्यातील 10 शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आली आहे. या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून स्मार्ट सिटीच्या निर्माण कार्यात जर्मन कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
या बैठकीप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील पाण्याची समस्या सोडविण्याबाबत उपाययोजनांची ‘श्वेत पत्रिका’ प्रकाशित करण्यात आली.