रुपेरी पडद्यावर एखादी जोडी हिट झाली की ती पुन: पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत रहाते. मग ती प्रियकर-प्रेयेसीची असो, भाऊ-बहिणीची असो, पती-पत्नीची असो वा दोन मित्रांची असो… अशाच दोन मित्रांची जोडी मागील काही दिवसांपासून रूपेरी पडद्याच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर आरूढ झाली आहे. आजच्या तरूणाईचे लाडके अभिनेते असलेले आदिनाथ कोठारे आणि सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलेला ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ बहुचर्चित सिनेमा ५ जून रोजी प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटात पुन्हा आदिनाथ-सिद्धार्थची जोडी जमली आहे.
‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ या चित्रपटाची कथा तरूण पिढीच्या आजच्या विचारसरणीवर आधारित आहे. यात आदिनाथ आणि सिद्धार्थ मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात आदिनाथचं नाव जय आहे, तर सिद्धार्थचं वीरू… जय-वीरू म्हणताच ‘शोले’मध्ये अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका आठवतात. पण हे जय-वीरू त्यांच्यासारखे मुळीच नाहीत. हे जय-वीरू आजच्या तरूणाईचं प्रतिनिधीत्व करणारे आहेत. त्यामुळे या जय-वीरूच्या रूपात आजच्या तरूणाईचं प्रतिबिंब रूपेरी पडद्यावर उमटणार आहे. आदिनाथ- सिद्धार्थ या जोडीला यापूर्वीही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याने ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’मधील त्यांचं कामही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’च्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी दिल्याने दोघेही श्रावणी देवधर यांचे आभार मानतात. या चित्रपटात साकारलेला जय-वीरू पाहताना प्रेक्षकांना आमचं एक नवं रूप दिसेल, अशी खात्रीही त्यांनी दिली आहे.
‘मुव्हिंग पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ या चित्रपटात आदीनाथ आणि सिद्धार्थसोबत मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत यांसारखे मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. दिग्दर्शनासोबतच श्रावणी देवधर यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यावर शिरीष लाटकर यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. कॅमेरामन राहुल जाधव यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. गीतं श्रीरंग गोडबोले यांनी लिहिली असून सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल श्रृंगारपुरे या आजच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’मधील गीतांना स्वरसाज चढवला आहे.