दारूबंदी जिल्ह्याकरिता विशेष मोहीम राबविणार- मुख्यमंत्री

Date:

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच दारूबंदी करण्यात आली असून गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात यापूर्वीच दारूबंदी करण्यात आली आहे. या दारूबंदी जिल्ह्यात लगतच्या जिल्ह्यातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या दारूचा व्यवसाय होत असल्याने या जिल्ह्यात दारूबंदीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानपरिषदेत दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील यावली येथे दारूबंदीसाठी आग्रह धरणाऱ्या पोलीस पाटील यांच्या हत्येप्रकरणी विधानपरिषद सदस्य संदीप बाजोरिया, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील पोलीस पाटलांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे पोलीस पाटील विरेंद्र राठोड यांच्या हत्येप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे दारूबंदीबाबतचे धोरण हे प्रतिबंधात्मक असून त्याचे नियमन होण्यासाठी अन्य जिल्ह्यात परवाने देण्यात आले आहेत. तथापि, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावयाची असल्यास त्याबाबत आढावा घेणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी एका उपप्रश्नाला उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले, दारूबंदीसंदर्भात गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. ग्रामसभेत ठराव केल्यानंतर दारू विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचा शासन प्रयत्न करणार आहे. मात्र त्या भागातील मागणी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण किमान 50 टक्के असणे आवश्यक असून त्या स्त्रियांची नावे त्या मतदारयादीत समाविष्ट असणे गरजेचे आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेस बारवी धरणातून लवकरच अतिरिक्त पाणी देणार- मुख्यमंत्री
बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील सांडव्याकडील भागाची उंची वाढविण्याचे व त्यावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून या धरणाच्या सांडव्याचे काम 68.60 मीटर तलांकापर्यंत वाढविल्यास पाणी फुगवठ्यामुळे काचकोली पाड्यातील तसेच मौजे तोंडली येथील घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांचे लवकरात लवकर पुनर्वसन करून कल्याण-डोंबिवली महापालिकेस अतिरिक्त पाणी देण्याचा प्रश्न तपासून पाहू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

बारवी धरणातून अतिरिक्त पाणी मिळण्यासंदर्भात सदस्य सर्वश्री संजय दत्त, निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मौजे तोंडली येथील पुनर्वसन गावठाणाची विकासकामे 50 टक्के पूर्ण झाली आहेत. तथापि तोंडली ग्रामस्थांनी उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल केल्याने एप्रिल 2014 पासून सदरची कामे ग्रामस्थांनी बंद पाडली आहेत. मात्र त्यावर सामोपचाराने तोडगा निघू शकतो. सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने धरणाचे काम करता येत नाही. पावसाळा संपल्यानंतर बारवी धरणाची उर्वरित कामे तत्काळ करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना वाजवी दरात दर्जेदार बी-बियाणे मिळणार- प्रा. राम शिंदे
शेतकऱ्यांना वाजवी दराने चांगल्या प्रतीची खते, बी बियाणे, किटकनाशके इत्यादी प्रकारच्या कृषी निविष्ठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे. महाराष्ट्र कापूस बी-बियाणे पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किंमतीचे निश्चितीकरण विनियमन अधिनियम 2009 अन्वये कापूस बियाण्यांच्या कमाल विक्री किंमती राज्य शासन नियंत्रित करत असून दि. 8 जून 2015 च्या अधिसूचनेद्वारे बीटी-कॉटन बियाण्यांच्या किंमती रू. 100 ने कमी केल्या असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे विचारलेल्या प्रश्नासंदर्भात सांगितली.

विधानपरिषद सदस्य श्रीमती शोभाताई फडणवीस, सर्वश्री जयंत पाटील, महादेव जानकर यांनी बियाणांच्या काळ्याबाजारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी प्रा. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, महाबीज व राष्ट्रीय बीज निगम या शासनाच्या अधिपत्याखाली येत असून बीटी-कॉटन हे बियाणे 8 जून 2015 च्या अधिसूचनेअन्वये ज्या विक्रेत्यांनी दिनांक 8 जूननंतर अधिक किंमतीने बियाण्यांची विक्री केली असेल, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.

औरंगाबाद येथील समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या तक्रारीची सचिव स्तरीय चौकशी- डॉ.रणजित पाटील
औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या निविदेतील अटी व शर्तीनुसार डी.आय. पाईपऐवजी एच.डी.पी.ई व डी.आय. पाईप वापरण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झाला नसल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

औरंगाबाद येथे समांतर जलवाहिनीचे कामासंदर्भात विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुभाष झांबड, संदीप बाजोरिया, जयंत पाटील या सदस्यांनी लक्षवेधी मांडली होती, त्यावेळी डॉ. पाटील बोलत होते.

केंद्र शासन पुरस्कृत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाच्या (जेएनएनयुआरएम) अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्मॉल ॲन्ड मिडीयम टाऊन (युआयडीएसएसएमटी) या उपअभियांतर्गत औरंगाबाद शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या रूपये 359.67 कोटी किंमतीच्या प्रस्तावास केंद्र शासनाने 2009 साली मान्यता दिली होती. तथापि, औरंगाबाद महानगरपालिकेच्या 2 मार्च 2015 च्या ठरावाच्या अनुषंगाने झालेली तक्रार लक्षात घेता सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

ईगल फायर वर्क्स या कारखान्यातील स्फोटप्रकरणी दंडाधिकारीय चौकशीचे आदेश- विजय देशमुख
कवठेएकंद येथील ईगल फायर वर्क्स या शोभेच्या दारू बनविणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांना नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगाने कामगार न्यायालयाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली.

कवठेएकंद (ता.तासगाव, जि. सांगली) येथे झालेल्या शोभेच्या दारू स्फोटसंदर्भातील लक्षवेधी सदस्य हेमंत टकले, महादेव जानकर यांनी मांडली होती, त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. ते म्हणाले, याप्रकरणी कारखाने अधिनियम 1948, महाराष्ट्र कारखाने नियम 1963, स्फोटके अधिनियम 1884, स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 तसेच भारतीय दंडविधानअंतर्गत भोगवटादाराविरूद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...