खासदार संजय काकडे यांची शिवसेनेच्या एकला चलोच्या निर्णयावर स्पष्ट भूमिका
पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही अभ्यास न करता एकला चलोचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या खाषदार व आमदारांशी जरी ते बोलले तरी हे समजेल. पंतप्रधान मोदींच्या लाटेमुळे 2014 च्या निवडणुकीत कधी नव्हे ते शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. आता एकटे लढल्यावर त्यांचे केवळ 4 ते 5 खासदारच निवडून येतील, असे मत भाजपाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेच्या एकला चलोच्या निर्णयावर व्यक्त केले.
शिवसेनेच्या स्थापनेपासून आणि बाळासाहेब हयातीत असेपर्यंत 1985 पासून शिवसेनेचे सर्वाधिक 15 खासदार निवडून आले. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या लाटेत 2014 च्या निवडणुकीत त्यांचे 18 खासदार आले. याची जाणीव शिवसेनेला आहे. त्याचा विसर त्यांना पडू नये.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार निवडून आलेल्या मतदार संघात भाजपाचे 42 आमदार आहेत तर, शिवसेनेचे 30 आमदार आहेत. तसेच, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या सर्व निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले व महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष झाला. नाशिक व पिंपरी चिंचवड येथे जरी शिवसेनेचे खासदार असले तरी तेथे भाजपची एकहाती सत्ता आहे, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.
मुंबईत भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी तीन खासदार अाहेत. तर, महापालिकेत भाजपचे 26 वरून 82 नगरसेवक झालेत. महापालिकेत शिवसेना सत्तेत असली तरी 36 पैकी 18 आमदार भाजपचे आहेत. शिवसेनेचे केवळ 13 आमदार आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी घाई गडबडीत निर्णय घेतल्याचे वाटते. खासदार व आमदारांशी त्यांनी वैयक्तिक चर्चा केल्यास उद्धव ठाकरे यांना त्यांचा निर्णय चुकल्याची जाणीव होईल, असेही खासदार काकडे यांनी सांगितले.
शिवसेनेने एकला चलोची भूमिका घेतलीच आहे. तर, भाजपही स्वबळावर निवडणूक लढेल व राज्यात 48 पैकी 30 खासदार भाजपचे सहज येतील, असा विश्वास व्यक्त करतानाच खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेला मात्र त्याची जबर किंमत मोजावी लागेल. त्यांचे केवळ 4 ते 5 खासदार निवडून येतील, असे सांगितले. उद्धव दूरदृष्टी ठेवणारे नेते त्यामुळे पूनर्विचार निश्चित करतील, अशी आशाही खासदार काकडे यांनी यावेळी व्यक्त केली.
विधानसभा वेगळी लढल्याने भाजपचे 123 आमदार निवडून आलेत. त्यानंतर जलयुक्त शिवार ते कर्जमाफी पर्यंतचे अनेक निर्णय झालेत. पंतप्रधान मोदींची लाट कायम आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले आहे. यामुळे येणाऱ्या 2019 च्या निवडणुकीत भाजपचे 175 आमदार निवडून येतील, असा विश्वासही खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.
खासदार काकडे म्हणाले की, भाजपची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. 2014 मध्ये पराभूत झालेल्या 37 विधानसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर दिल्यावर त्यातील किमान 25 ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येईल, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.