पालकमंत्री गिरीश बापट यांची पीएमआरडीए आढावा बैठकीत सूचना
पुणे-– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)मधील हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो, रिंगरोड, महाळुंगे टीपी स्कीम, पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकाम, अग्निशमन केंद्र आदी विकासकामांचा महत्वपूर्ण बाबीवर बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली दि. १८ जुन २०१८ रोजी औंध कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता झाली.
सदर बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, अनधिकृत बांधकाम नियंत्रक प्रमुख तथा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत वरखेडकर, मेट्रो मुख्य अभियंता विवेक खरवडकर, रिंगरोड मुख्य अभियंता चंद्रकांत जावळे, पाणीपुरवठा मुख्य अभियंता विठ्ठल तांदळे, विशेष
कार्यकारी अधिकारी सुहास मापारी, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, अग्निश्मन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, मुख्य प्रशासन अधिकारी अर्चना तांबे उपस्थित होते.
बैठकीत हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी विविध ठिकाणी असलेले भूसंपादन तसेच शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आलेले प्रस्ताव व निविदा याबाबत चर्चा झाली. तसेच म्हाळुंगे, वडाचीवाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी यांसह 15 गावात टीपी स्कीमच्या सध्यस्थीतीचा आढावा घेण्यात आला. म्हाळुंगे टीपी स्कीम लवकरच एक आदर्शवत टीपी स्कीम म्हणून नागरिकांना मिळणार आहे. म्हाळुंगे जवळील जवळपास सर्व नागरिकांनी या योजनेसाठी तयारी दर्शविली आहे.
पुण्यातील १२४ किलोमीटरचा रिंगरोड पीएमआरडीए मार्फत करण्यात येणार आहे. रिंगरोडसाठी वाघोली जवळची 30 किमीची जागा ताब्यात मिळाली आहे. तसेच वाघोली पाणी प्रश्नावरही यावेळीचर्चा करण्यात आली. पीएमआरडीए
क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावून निष्कासनाची तत्पर कारवाई केली जाणार असल्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
पीएमआरडीए हद्दीतील दि. ३१/१२/२०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी २१ जुन २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सदरची जाहीर सूचना २२/१२/२०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरची मुदत चार महिने म्हणजेच २१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांची सूचना लक्षात घेता ही मुदत वाढून देण्यात आलेली आहे. तदनंतर पीएमआरडीएच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच पीएमआरडीएच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना, वाघोली अग्निशमन केंद्र तसेच वाघोली, शिक्रापूर बायपासचे कामकाजाच्या पाहणी लवकरच पालकमंत्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मस्तानी, भूगाव, वडाचीवाडी, येवलेवाडी तलावातील गाळ कामकाजाची देखील सध्य स्थिती जाणून घेतली. तसेच लवकरच या कामकाजासाठी लागणारी यंत्रसामग्री पीएमआरडीएकडून उपलब्ध होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत सेवाभावी संस्थांची मदत घेऊन उद्भवणाऱ्या समस्या तातडीने सोडवता येतील असेही सांगितले, आदी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत केल्या.