विजेत्या गावांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य
जलप्रशिक्षित गावांनी जलदूत व्हावे
-मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : पाणी फौंडेशनच्या माध्यमातून जलप्रशिक्षीत झालेल्या गावांनी परिसरातील किमान पाच गावे जलस्वयंपूर्ण केल्यास त्यांना ‘जलदूत’ म्हणून राज्य शासनाकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्तीचे स्वप्न साकारत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
‘सत्यमेव जयते वॉटर कप’ विजेत्या गावांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य वितरणाचा सोहळा मंत्रालयातील परिषद सभागृहात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पाणी फौंडेशनच्या माध्यमातून एप्रिल ते मे दरम्यान तीन जिल्ह्यांमध्ये ‘वॉटर कप स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा 15 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी विजेत्या गावांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. त्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी आजचा अर्थसहाय्य वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी 21 गावातील सरपंच व ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पाणी फौंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध अभिनेते आमीर खान, किरण राव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी जलसंधारणाचे महत्व समजून घेतले पाहिजे. पाण्याचे विज्ञान समजून घेऊन गावकऱ्यांनी जलसंधारणाचे काम केले तर त्या गावाला पाणी टंचाईला सामारे जावे लागणार नाही. लोकसहभागातून संपूर्णपणे जलस्वयंपूर्ण गाव होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, एखाद्या गावाने चांगले काम केल्यावर शासनाकडून त्याची दखल घेतली जाते. शाबासकीची थाप म्हणून बक्षीस रुपात अर्थसहाय्य दिले जाते. त्यामुळे अन्य गावांना देखील प्रोत्साहन मिळते आणि ते देखील आपल्या गावात अशाच प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून एक नवी चळवळ उभी राहते. बक्षिस विजेती ग्रामस्थ ज्यावेळी येथून आपल्या भागात परत जातील त्यावेळी ते परिसरातील किमान २५ गावांना प्रेरणा देतील.
वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाणी फौंडेशनतर्फे अमरावती, बीड, सातारा जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यांतील गावांना जलसंधारणाच्या कामांसाठी प्रशिक्षित केले. ही गावे बक्षिसप्राप्त ठरली. आता ह्या गावांनी किमान पाच गावांना जलस्वयंपूर्णतेसाठी प्रशिक्षित करावे त्यांना शासनातर्फे ‘जलदूत’ म्हणून गौरविण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आज ज्या गावांमध्ये कामे पूर्ण झालेली आहेत आणि त्याठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, तिथे मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला आहे. निसर्गाने जणू ग्रामस्थांच्या आणि शासनाच्या प्रयत्नांना आशिर्वाद दिला असल्याचे सांगत पाणी या विषयावर सामाजिक जाणीवेतून काम करणाऱ्या अभिनेते आमीर खान यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
अभिनेते आमीर खान म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाणी या विषयावर काम करण्यास आम्ही सुरूवात केली आहे. पाणलोट विकासाच्या क्षेत्रात सर्व गावांनी सहभागी झाले पाहिजे. पाणी प्रश्न निकाली निघाला तर जनसामान्यांना त्याचा खूप फायदा होईल.
जलसंधारण विभागाचे सचिव पुरूषोत्तम भापकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी वॉटर कप स्पर्धेत प्रथम पारितोषीक विजेत्या वेळू, ता. कोरेगाव, जि. सातारा या गावास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळविलेल्या जायगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा व खापरटोन, ता. अंबाजोगाई, जिल्हा बीड या गावांना प्रत्येकी १५ लाख रुपये देण्यात आले. तृतीय क्रमांक मिळविलेल्या राडीतांडा, ता. अंबाजोगाई, जि. बीड, व वाठोडा, ता. वरूड, जि. अमरावती या गावांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेल्या गावांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले. त्या गावांची नावे अशी: कुंबेफळ (ता. अंबाजोगाई, जि. बीड), पाटोदा (ता. अंबाजोगाई, जि. बीड), अनपटवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा), गव्हाणकुंड (ता. वरूड, जि. अमरावती), श्रीपतरायवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड), सेलू (ता. अंबाजोगाई, जि. बीड), दैठनाराडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड), शेपवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड), पाडळीस्टेशन (ता. कोरेगाव, जि. सातारा), बोधेवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा), रामोशीवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा), टेंबूरखेडा (ता. वरूड, जि. अमरावती), सावंगा (ता. वरूड, जि. अमरावती), पोरगव्हाण (ता. वरूड, जि. अमरावती).
हिवरे (ता. कोरेगाव, जि. सातारा) व नलावडेवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावांमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमास आमदार डॉ. अनिल बोंडे, योगेश सागर तसेच पारीतोषिक विजेत्या गावांमाधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.