मुंबई-गंगेमध्ये प्रेतांचा खच पडत आहे हे पाप कोणाचं, अशा प्रकारची अप्रत्यक्ष टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामना ह्या ‘रोखठोक’ सदरातून करण्यात आली आहे.याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज राज्यात एका ठिकाणी ४६ प्रेत जाळली गेली हे पाप कोणाचे ? राज्यात मृत पावलेल्यांचा खरा आकडा सरकारने लपवला, ते मृतदेह कुठे गेले, ते पाप कोणाचे ? एका अॅम्ब्युलन्समधून २३ प्रेत नेली जातात, प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येतो, हे पाप कोणाचं ? म्हणजे आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्यांच वाकून बघायचं, अशी रोखठोककारांची प्रवृत्ती दिसते, असा आरोप खा. संजय राऊत यांच्यावर केला आहे.
कोकण किनारपट्टी भागाला ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून अनेक घरांचे, बागायतींचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून वादळग्रस्तांना ‘हात मदतीचा’ या अभियानांतर्गत मदत उपलब्ध करुन दिली जात असून आज असाच एक पत्रे, ब्लँकेट, बल्ब आणि विविध उपयोगी साहित्याचा ट्रक भाजपाच्या आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी यांच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यात पाठवण्यात आला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ट्रकला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व खासदार गोपाळ शेट्टी यांनी हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दरेकर म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून आम्ही संकट काळात वादळग्रस्तांना मदत करून आमची जबाबदारी पार पाडत आहोत. राज्यात यापूर्वी अनेक संकटं आली, मुंबई शहरानेही अनेक संकटं झेलली, याच संकटातून आपण पुन्हा उभे राहिलो आणि इतरांनाही उभं करण्याचं काम केलं आहे. ही आपली संस्कृती आणि परंपरा असल्यामुळे करोना असो नाही तर चक्रीवादळ पुन्हा एकदा सर्वांनी मिळून काम करू, या मदतीच्या माध्यमातून लोकांना विश्वास देऊ. संकट काळात भाजपाचे कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करीत आहेत, कधीकाळी शिवसेना गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे करायची, परंतु आज शिवसेनेत ती सामाजिक बांधिलकी दिसून येत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्र्यांचा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांनी कोकणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी तीन दिवसीय दौरा केला होता. त्याविषयी बोलताना दरेकर म्हणाले, फडणवीसजी यांच्याबरोबर ७०० किलो मीटरचा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दौरा आम्ही केला. अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त लोकांची भेट घेऊन मच्छीमारांशी, बागायतदारांशी संवाद साधला, त्यांच दुःख समजून घेत मदतीचा विश्वासही आम्ही त्यांना दिला. परंतु राज्याचे मुख्यमंत्री तीन तास सुद्धा कोकणाला देऊ शकले नाहीत, यावरून सरकारच्या जनतेबाबत, कोकणवासीयांबाबत काय संवेदना आहेत, हे दिसून येतं. वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे, वादळ हे ४ तास थांबले होते, मुख्यमंत्री पुरते ३ तास थांबू शकले नाहीत. हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेला होता का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई प्रवास करतात आणि आम्ही जमिनीवरून दौरा करतो, अशी टीका मुख्यमंत्री यांनी केली होती. त्यावर दरेकर म्हणाले, ते विसरत आहेत की, स्वतः खासगी विमान घेऊन रत्नागिरी येथे गेले, विमानतळावरचं बैठक घेतली. नुकसानग्रस्त लोकांची भेट घेणं तर लांबच परंतु त्यांनी कलेक्टर ऑफिस येथे जाऊन माहिती सुद्धा घेतली नाही. सर्व अधिकाऱ्याना विमानतळावर बोलावून बैठक घेतली, बैठक झाल्यावर चिपी विमानतळावर गेले अधिकाऱ्याना बोलवले आणि हेलिकॉप्टरने परत मुंबईला आले. त्यामुळे स्वतः विमानाने दौरा केल्यानंतरही पंतप्रधानांवर हवाई दौरा करतात, अशी टीका करताना मुख्यमंत्री जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होते का ? असा खोचक सवालही दरेकर यांनी केला.
जनतेच्या डोळ्यात धूळफेक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोटोसाठी कोकण दौरा केला, असा आरोप मुख्यमंत्री यांनी केला होता. त्याबाबत दरेकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी एका फोटोसाठी कोकणातील यंत्रणा तीन दिवस कामाला का लावली ? मुख्यमंत्री कोकणात येणार म्हणून तीन, चार दिवस सर्व अधिकारी त्यांच्या व्यवस्थेत व्यस्त राहिले, मुख्यमंत्री गेले नसते तर त्या ३-४ दिवसांत अधिकाऱ्यानी कोकणवासीयांना काहीतरी दिलासा दिला असता. पंचनामे झाल्यावर मदत करू, असे मुख्यमंत्री सांगत असतील तर मुख्यमंत्री गेले तेंव्हा पंचनामे झाले नव्हते का ? असा सवाल करून दरेकर म्हणाले, आमच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी ९० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे आम्हाला सांगितले. जेव्हा आपत्ती येते तेव्हा तत्काळ मदत करायची असते. परंतु दुर्दैवाने राज्याचे मुख्यमंत्री करू शकले नाही. हे सरकार केवळ दिखाऊपणा आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
भाजप मदत करण्यास सक्षम
कोकणांत नितेश राणे यांच्यामार्फत २ ट्रक पत्रे आणि कौले कोकणवासीयांना देण्यात आली. या विषयी प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, अजूनही सामान भाजप नुकसानग्रस्त लोकांसाठी पाठवत आहे. शेवटी हा आधार संकट काळात राज्यसरकारकडून मिळणं आवश्यक आहे परंतु तोच आधार, ती मदत भाजप करीत आहे. भाजपमध्ये सर्व आमदार, कार्यकर्त्यांना माणुसकी, सामाजिक बांधिलकी आहे याचा मला अभिमान आहे,