पुणे- माजी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, “४८ तासांत शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार आहेत? उगीच काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी काय केलं? असा माझा सवाल आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टात आहे, तिथे चांगल्या पद्धतीने बाजू मांडून निर्णय घेता येतील,” शिवतारे म्हणाले.
“सीमावादावरून शरद पवार शंभर टक्के राजकारण करत आहेत.
“एखाद्या गोष्टीचं राजकारण करून मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवण्याचं काम केलं जात आहे. हे सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. प्रचंड वेगाने निर्णय घेत आहे. महाविकास आघाडीला तीन वर्षात जे जमलं नाही, ते सगळे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या तीन महिन्यात घेतले आहेत. या निर्णयांमुळे या सरकारची लोकप्रियता आणखी वाढेल आणि आपल्याला अडचण निर्माण होईल, यासाठी केलेलं हे नाटक आहे,” असा आरोपही विजय शिवतारे यांनी केला.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना माजी राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, ‘विमानतळ प्रकल्प बारामतीला करण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरविले होते. मात्र, नव्या जागेला केंद्राकडून नकार देण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांत यापूर्वी निश्चित केलेल्या जागेतच प्रकल्प होणार असून सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमआयडीसी) माध्यमातून भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना पुढील १५ दिवसांत निघेल.’