हारी बाजी को जीत लिया..हजारो चाहत्यांच्या प्रेमाने भारावले ठाकरे कुटुंब
मुंबई – शिवसैनिक आणि चाहते नागरीक यांच्या अलोट प्रेमाचे दर्शन घेत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवास्थान वर्षा सोडलं आहे. संध्याकाळी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधतांना ठाकरेंनी आपण वर्षा बंगल्यातून आज बाहेर पडणार असून, येथून मातोश्री येथे जाणार असल्याचे सांगितले होते.
वर्षा बंगला सोडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह वरूण सरदेसाई हेदेखील उपस्थित होते. यावेळी वरूण यांची देहबोली ही भावनिक असल्याची दिसून येत होती.
काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार नाहीत, आम्ही लढत राहू असे सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री वर्षा बंगल्याहून मातोश्रीवर राहण्यासाठी निघाले आहेत. मोह माया सत्ता याचा आम्हाला अजिबात लोभ नाही आम्ही लढणारे लोक आहोत, लढत राहू. अखेर सत्याचा विजय होईल असे विधान संजय राऊत यांनी केलं होतं
असंख्य कार्यकर्त्यांनी वर्षा बंगल्यासमोर गर्दी केली होती. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. तसंच मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यातही हे प्रेम पाहुन अश्रू दाटून आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेदेखील होते. कार्यकर्त्यांमधून वाट करत ते मातोश्रीच्या दिशेने निधून गेले.