मुंबई-राज्यसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या उमदेवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली, हे देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दामून जोर देऊन सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर विधानभवनाबाहेर उपस्थित असलेल्या भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना काल दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज पहाटे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील जनतेने २०१९ साली भाजपला जनमत दिले होते. मात्र, आमच्या पाठीत सुरा खुपसून महाविकास आघाडीने ते काढून घेतले. मात्र, अशाप्रकारे स्थापन झालेले सरकार किती अंतर्विरोधाने भरलेले असू शकते, हे आजच्या विजयाने स्पष्ट झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले.जे स्वत:लाच महाराष्ट्र समजतात, जे स्वत:लाच मुंबई समजतात, जे स्वत:लाच मराठी समजतात, त्या सगळ्यांना या विजयाने लक्षात आणू दिले आहे की, ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, ते म्हणजे मुंबई नाहीत. महाराष्ट्र म्हणजे राज्यातील १२ कोटी जनता आहे. भाजपला मिळालेला आजचा विजय हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. मी हा विजय आमचे लढवय्ये नेते मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो. आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली होती. हा विजय म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट आहे. आम्ही त्यांना भेट म्हणून कोल्हापूरचा पैलवान दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
उद्या काय काय मुजोरी होणार आहे ते माहिती आहे. शिवसेनेचं जे मत बाद झालं, ते ग्राह्य झालं असतं तरी आमचा विजय झाला असता. नवाब मलिकांना जरी न्यायालयानं परवानगी दिली असती, तरी आमचा विजय झाला असता. हा कुठल्या जोडतोडीचा विजय नाही, तर पूर्ण कोटा पूर्ण करून मिळवलेला विजय आहे, असं देखील फडणवीसांनी नमूद केलं.
“भाजपाच्या अपक्ष आमदारांचं आणि जे आमच्यासोबत नव्हते, तरीही आम्हाला मतदान केलं असा सगळ्या आमदारांचे मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा जे स्वत:ला महाराष्ट्र, मुंबई समजतात, मराठी समजतात, त्यांना या विजयाने हे लक्षात आणून दिलं की महाराष्ट्र म्हणजे ते नाही, मुंबई म्हणजे ते नाही, इथली जनता आहे. मराठी म्हणजे जगभरातले मराठी आहेत. ही विजयाची मालिका सुरू झाली आहे. आता ही मालिका अशीच पुढे सुरू राहील”, असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला.“चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढलो. त्यांच्या वाढदिवशी त्यांना भेट देऊ असं ठरवलं होतं. प्रत्यक्ष कोल्हापूरचा पैलवानच भेट स्वरूपात चंद्रकांत पाटलांना दिला आहे. अश्विनी वैष्णव ठाण मांडून इथे बसले, आम्हाला मदत केली. म्हणून त्यांचे आभार मानतो”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.