औरंगाबाद-आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्यपाल पदाची प्रतिष्ठा जपणारे राज्यपाल मिळाले होते. हे आताचे जरा चमत्कारिक राज्यपाल आहेत, पण राज्यपाल असल्याने मी त्यांच्यावर जास्त काही बोलणार नाही असा टोला शरद पवारांनी लगावला.राज्यपालांवर कडाडून टीका करताना पवार म्हणाले की, अडीच वर्षे राज्यपालांकडे कष्टांची कामे होती, त्यामुळे त्यांना मविआच्या मागणीकडे लक्ष देता आले नाही. अध्यक्ष निवडता आला नाही. आता मात्र त्यांनी जे काम अडीच वर्षात केले नाही ते दोन दिवसांत केले. पदाची प्रतिष्ठा सांभाळणारे राज्यपाल राज्याला मिळाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. शरद पवार म्हणाले की, “औरंगाबादचे नामांतर हे संभाजीनगर करण्यात आलं, हा मविआचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला. प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आम्हाला समजलं. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यावर काही बोलणं योग्य नसतं. पण या नामांतरापेक्षा औरंगाबादच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं.”
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना नेते अनिल परब यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणताही विरोध केला नाही, त्यांनी याचं समर्थन केल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. पण आता यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. त्यांनी हा निर्णय घेताना कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा केला. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला आणि नंतर आपल्याला समजल्याची माहिती त्यांनी दिली.
पवार म्हणाले, खरी शिवसेना कोणती हे उद्या न्यायालयात सिद्ध होईल मी कोण सांगणार? या सर्व संकटातूनन मी एकदा गेलो होतो. देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.
पवार म्हणाले, बंडखोरीच्या निर्णयाला काहीही आधार नाही. बंडखोर काहीही कारणे देत आहेत. त्यांना लोकांसमोर जावे लागते लोकांना काही तरी कारणे द्यावीच लागणार त्यामुळे ते आता काहीही कारणे देत आहेत. त्यांच्याकडे ठोस कारणे नाहीत. सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. ते कशापद्धतीने निर्णय घेतात ते समजेल. आमचे बंड एक दिवसांचे आणि सहा लोकांचे होते आम्ही कुणाला इकडे तिकडे घेऊन गेलो नाही.
मविआचे सरकार पडल्यानंतर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आले की, केंद्र सत्तेचा गैरवापर करतेय का यावर पवार म्हणाले, केंद्रातील सत्तेचा वापर राज्यातील सरकार पाडण्यासाठी केला जात आहे. कर्नाटक, महाराष्ट्रात जे झाले तेच आता गोव्यात होत आहे. लोकशाहीचा उद्वस्त करण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरु आहे.

