पुणे-राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्यासंदर्भात चार ते पाच दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली.आज शुक्रवारी राज्य कोरोना कृती दलाची मुख्यमंत्र्यांसमवेत पुन्हा बैठक आहे. या बैठकीत कृती दल काय मत व्यक्त करते त्यावर शाळा उघडण्याचा निर्णय अवलंबून राहील, असेही टोपे यांनी सांगितले.
शाळा उघडण्यासंदर्भात राज्य कृती कोरोना कृती दलाने प्रतिकूल मत व्यक्त केले होते. त्यामुळे शाळा उघडण्याबाबत निर्णय प्रलंबित ठेवला होता. डेल्टा प्लससंदर्भात राज्यात चिंतेची सध्या स्थिती नाही. त्यामुळे शाळा उघडण्याबाबत निर्णय होऊ शकतो. प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत मात्र राज्य कोणतीही घाई करणार नसून त्याबाबत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही टोपे म्हणाले.
राज्य सरकारचे कोरोनाविषयक सल्लागार सुभाष साळुंके यांनी, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटलेली आहे, तेथे शाळा उघडण्यास हरकत नाही, असे मत व्यक्त केले आहे. शालेय शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनांना १७ ऑगस्टपासून शाळा उघडण्यास संमती दिलेली होती. मात्र राज्य कोरोना कृती दलाच्या प्रतिकूल मतामुळे शाळा उघडण्याचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.