पुणे – स्वातंत्र्य़वीर सावरकर यांनी रत्नागिरीतील ज्या कारागृहात तेरा वर्षे शिक्षा भोगली, त्या कोठडीते त्यांचे स्मारक करण्यात आले आहे. तथापि ती कोठडी कारागृहात असल्याने लोकांना त्या स्मारकाला भेट देणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे रत्नागिरीतील कारागृहातील सावरकरांचे स्मारक लोकांसाठी खुले व्हावे यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी येथे सांगितले. तसेच फ्रांसमधील मार्सिलिस येथेही सावरकरांचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 139 व्या जयंती आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संवाद पुणे आणि बढेकर ग्रूप यांनी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित केलेल्या “महानायक सावरकर क्रांती सूर्याची तेजस्वी गाथा” या सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ. गो-हे बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते ‘सावरकर विचारधारा युव पुरस्कार’ अभिनेत्री व लेखिका अपर्णा चोथे यांना प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर बढेकर ग्रूपचे प्रवीण बढेकर, संवादचे सुनील महाजन, निकिता मोघे उपस्थित होते.
डॉ. गो-हे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सावरकर भक्त असल्याने त्यांचे संस्कार आमच्यावर झाले आहे. सावरकरांच्या स्मारकांबद्दलची महिती इंटरनेटवर मिळते पण त्या रत्नागिरीच्या स्मारकाचा उल्लेख नसल्याचे आपल्या निदर्शनास आले. त्यामुळे रत्नागिरीला जाण्याची संधी मिळाली तेव्हा आपण त्या कारागृहातील कोठडीला भेट दिली. त्याची अतिशय चांगली व्यवस्था कारागृह प्रशासनाने ठेवली आहे. तसेच तेथे एक प्रदर्शनही उभे केले आहे. मात्र या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी आहेत तो भाग सध्या कारागृहाचाच भाग असल्याने लोक सहजपणे बघण्यासाठी तेथे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे हे स्मारक लोकांसाठी खुले करण्याबाबत आपण कार्यवाही सुरू केली आहे. त्याबरोबरच ज्या मार्लेलिस बंदरात सावरकर पोचले तेथेही त्यांचे एक स्मारक व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
प्रवीण बढेकर म्हणाले, सावरकरांनी वयाच्या 26 व्या वर्षापर्यंत 26 पुस्तके लिहिली असल्याचे आपल्या वाचनात आले. यातूनच प्रेरणा घेऊन आपण वयाच्या 26 व्या वर्षी स्वतंत्र्य व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले. आज मी सावरकरांचे विचार लोकांसमोर मांडण्याइतका मोठा नाही पण त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवणा-यांना मदत करण्याइतका एक सावरकरप्रेमी म्हणून नक्कीच सक्षम आहोत. त्यामुळेच या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. पुढेही सावरकरांचे विचार पोचवण्यासाठी मदत करत रहाणार.
पुरस्कार प्राप्त अपर्णा चोथे म्हणाली, मी वैद्यकीय शिक्षण घेतले असले तरी आवड म्हणून कलेचे क्षेत्र निवडले आहे. लेखन व अभिनय करताना सावरकर बंधूंच्या पत्नींविषयी लिहिलेली “त्या तिघी” ही कादंबरी वाचनात आली. त्यातून मला या तिघींवर एक पात्री प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली. आजवर याचे 25 प्रयोग झाले आहेत. सावरकरांच्या पत्नींबद्दलची वास्तवता समाजापर्यंत पोचवण्याचे माझे प्रयत्न मी थांबवणार नाही. माझ्या या प्रयत्नांना राजाश्रय व लोकाश्रय द्यावा असे आवाहन त्यांनी सावरकरप्रेमींना केले.
प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी या कार्यक्रमाची संकल्पना विषद करून, डॉ. नीलम गो-हे यांनी राज्यातील नाट्यगृह व कलाकारांसाठी कसा पुढाकार घेतला हे सांगून सर्वांचे स्वागत केले. आभारप्रदर्शन निकिता मोघे यांनी केले.
पुरस्कार वितरणानंतर निकिता मोघे निर्मित “महानायक सावरकर” हा गीतांचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात जयोस्तुते नमोस्तुते….., हे हिंदूनृसिहा प्रभो शिवाजीराजा…., जय जय शिवराया…..ही सावरकांनी लिहिलेली शिवछत्रपतीची आरती, ने मजसी ने परत मातृभीला…, अनादी मी अनंत मी…., शतजन्म शोधिताना…..अशी सावरकांच्या लेखणीतून उतरलेली काही लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाची संहिता व निवेदन ऋचा थत्ते यांनी केले. गीते सुजित सोमण, श्रृती देवस्थळी, हेमंत वाळूंजकर यांनी सादर केली. त्यांना साथसंगत दर्शना जोग, अमृता ठाकूर देसाई, ऋतूराज कोरे, केदार मोरे, राजेंद्र सबनीस यांनी केली