मुंबई-चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना फार गांभीर्याने घेत असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच या विधानाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे”.
रावसाहेब दानवेंनी काय म्हटलं आहे –
“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.
“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.