मुंबई, दि. १ नोव्हेबर- राज्यतील एसटी कर्मचारी सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. कर्मचा-यांचे पगार वेळेत होत नसल्यामुळे एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणा-या एसटी कर्मचा-यांवर नोकरीतून काढून टाकण्याचा बडगा दाखविला जात आहेत. त्यामुळे एसटी व्यवस्थापनाने कर्मचा-यांच्या मागण्या तात्काळ मागण्या कराव्यात व संपकारी कर्मचा-यांच्या बडतर्फीचे अन्यायकारक परिपत्रक मागे घ्यावे, अन्यथा भाजप या विरोधात राज्यभर आंदोलन करेल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
विरोधी पक्षनेते दरेकर यांनी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली व एसटी कर्मचऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर, भाजपाच्या भायखळा मंडळ अध्यक्ष नितीन बनकर आदी उपस्थित होते.
भेटीनंतर दरेकर प्रसारमाध्यमाशी बोलत ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आज अंधारात जातेय. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सुमारे ३० च्या वर एसटी कर्मचाऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत. पण परिवहनमंत्री किंवा कोणी वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कुटुंबियांचे दु:ख कोणी बघायला गेले का? त्यांच्या कुटुंबियाना कोणी आधार दिला का ? त्यांचे अश्रू पुसण्याची आवश्यकता असून त्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. एसटी कर्मचारी अक्षरश: पिचला गेलाय. आज सकाळी कळंब येथे सच्चिदानंद नावाचा कर्मचारी झाडाला फास लावून आत्महत्या करायला जात होता. सुदैवाने पोलिसांनी त्याला खाली उतरवले. परंतु गेंडयाच्या कातडीच्या सरकारला संवेदना राहिलेल्या नाहीत. आज दिवाळी तोंडावर आली आहे तरीही कर्मचा-यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.
व्यवस्थाकीय संचालकांशी भेट घेऊन त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळ तात्काळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या भावना त्यांनी परिवहन खात्याला व राज्य सरकारला कळवाव्यात. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीन करून घ्यावे. ही प्रमुख मागणी केली. त्याचप्रमाणे संपकारी कर्मचारी कामावर रुजु न झाल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा एमडीनी काढलेला अन्यायकारक फतवा रद्द करावा अशीही मागणी करण्यात आल्याचे दरेकर यांनी सांगितले.
एसटी कर्मचारी त्यांच्या न्याय्य मागण्यांसठी आंदोलन करीत असून ते काही कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या गंभीर विषयावर कोणा मंत्र्यांकडे बोलायला मंत्र्यांकडे वेळ नाही. पण शाब्दिक कोट्या करायला व टोमणे मारायला वेळ आहे असे सांगतानाच ते म्हणाले की, आंदोलन करणे हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यामुळे भाजपा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे उभे आहे. कर्मचा-यांच्या युनियन कोणाच्या आहेत, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. कारण यूनियन कामगारांसाठीच असतात. सर्वांच्या प्रयत्नातून कामगारांचे भले व्हावे हाच आमचा उद्देश आहे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.