पुणे: प्रशासनाने युद्धपातळीवर कामे पूर्ण करून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो चा पहिला टप्पा जुलै महिन्यात आणि दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरु करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत गुरुवारी बोलताना केली.
हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणारी मेट्रो सेवा १५ जुलै २०२६ पासून सुरू होईल, अशी प्रशासनाकडून आशा व्यक्त केली जात होती. पण तसे होताना दिसत नाही. या प्रकल्पासाठी गेल्या काही वर्षांत अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या, मात्र प्रत्येक वेळी नवीन तारीख पुढे आली, असे आमदार शिरोळे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत विधानसभेत सांगितले.
पहिली अपेक्षित तारीख मार्च २०२३, त्यानंतर मार्च २०२५, त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये ९४% काम पूर्ण झाल्याचा दावा, त्यानंतर ३१ मे २०२६ तारीख (डेडलाइन) देण्यात आली होती, आणि सध्याची तारीख (डेडलाईन) १५ जुलै २०२६ आहे. पण, प्रत्यक्षात कामे पूर्णत्वाची जाहीर केलेली एकही तारीख पूर्ण झाली नाही. आणि आत्ताची तारीख पण पूर्ण होताना दिसत नाही.
तरी माझी सरकार ला विनंती आहे लवकरात लवकर राहिलेली अपूर्ण कामे युद्धपातळीवर पूर्ण करून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात आणि दुसरा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करावा. त्या मार्गावरून मेट्रो धावू लागावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

