कधी कधी वरुणराजा अवकृपा करतो आणि मग भंडारदरा धरण भरायला काहीसा उशीर होतो. यावर्षीही तसंच झालं. प्रवरामाईच्या भरवशावर जगणाऱ्या तिच्या असंख्य लेकरांचा जीव टांगणीला लागला. पण अखेरीस आज 12 सप्टेंबरला भंडारदरा भरले. ‘भंडारदरा भरले ‘ प्रवरामाईच्या कुशीत बागडणाऱ्या लाखो लोकांना हे दोन जादुई शब्द गेली अनेक वर्षे दिलासा देताहेत. कानात प्राण आणून लोक हे दोन शब्द कुणाच्या तरी तोंडून ऐकण्यासाठी किंवा डोळ्यात प्राण आणून कुठेतरी वाचण्यासाठी आतुर झालेले असतात. कारण हे दोन शब्द केवळ एखादी तांत्रिक प्रक्रिया समजून सांगत नाहीत तर पुढचे वर्षभर जीवाला बिनघोर करतात. हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा मनाला लाभणारं आत्मिक समाधान फक्त प्रवरेकाठच्या माणसांनाच माहीत असतं….
या समाधानाच, या आनंदाच शब्दात वर्णन करणे कठीण… ज्ञानेश्वर माउलींनी पांडुरंगाला बघून
‘ रूप पाहता लोचनी सुख जालें ओ साजणी ‘
हे जे वर्णन केले त्यात पांडुरंगाच साजिरं रूप बघून
‘आनंद झाला ‘
असं नाही म्हटलं तर
‘ सुख जालें ‘
असं म्हटलंय. अशीच काहीशी अवस्था अमृतवाहिनी प्रवरेच्या काठावर वसलेल्या आणि त्याच्या आजूबाजूच्या भंडारदरा ते प्रवरासंगम पर्यंतच्या गावातल्या लोकांची झालेली असते.
सर्वसाधारणपणे 15 ऑगस्ट पर्यंत भंडारदरा धरण भरते. यावर्षी तसे घडले नाही. काही ठिकाणी धो धो पाऊस बरसला तर काही ठिकाणी त्याने खूप वाट बघायला लावली. यावर्षी तब्बल एक महिना उशीरा भंडारदरा धरण भरले. दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीपासून भंडारदरा धरणात किती पाणी शिल्लक आहे याचं काऊंट डाऊन सुरू होतं. हे काऊंट डाऊन करणारात शेतकरी तर असतातच पण व्यापारी, उद्योजक आणि चाकरमानीही असतात, इथल्या जनमानसाचं भंडारदऱ्याशी इतकं घट्ट नातं नातं जुळलेलं आहे.
जिल्ह्यात कितीही मोठी घटना घडली आणि त्याच दिवशी भंडारदरा धरण भरले तरी वर्तमानपत्रात हेडलाईन होण्याचा मान भंडारदरा भरले या बातमीलाच मिळतो. दरवर्षी घडणारी ही तशी नैसर्गिक क्रिया पण त्यातली आतुरता गेल्या नऊ दशकात अजिबात कमी झालेली नाही. चला तर या सुखाच्या अनुभूतीचा आनंदोत्सव साजरा करूया…
लेखक -डॉ. संतोष खेडलेकर