“वहिनी यावर्षी गणपती आणणार आहेत ना? आणि हो तुमच्या बिल्डिंगमध्ये यायला परवानगी आहे ना?” काशीकर गुरुजींचा फोन आला.
“हो आणणार ना नेहमीप्रमाणे, तुम्ही येणार ना पूजा सांगायला.” – मी
“हो, मग दरवर्षीप्रमाणे मी येतो सकाळी ९ ला” – गुरुजी.
करोनामुळे अजूनही जनजीवन सुरळीत झालं नाही. लॉकडाऊनच्या ह्या संभ्रमात आपणच काय तर सगळे सण-उत्सवही बंदिस्त झालेत. यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा याबाबत काही महिन्यांआधी चर्चेला सर्व माध्यमांतून सुरुवात झाली होतीच आणि जसजशी बाप्पाच्या आगमनाची तारीख जवळ आली तसं तर बातम्यांना उधाणच आलं.
गणपतीची मूर्ती घरी कशी बनवायची याचे व्हिडिओ व्हाट्सअप, फेसबुकवर यायला लागले. इकोफ्रेंडली गणेश मूर्तीचा किटसुद्धा ऑनलाईन मिळू लागला. साधारण गुढीपाडवा झाला की गणेश मूर्तीच्या कारखान्यांत मूर्तिकारांच्या कामाचा श्रीगणेशा होतो आणि जूनपासून बुकींगला सुरुवातही होते. यावर्षी जूनच काय जुलै गेला तरी कारखान्यात / दुकानात मूर्ती आलेल्या किंवा रंगवल्या जाताना दिसत नव्हत्या. गणपती आणायचा तर ठरवलं पण मूर्ती कुठे मिळेल याची शोधाशोध सुरू झाली. आठवडाभर शोधकार्य केल्यावर बोरिवलीला वझिरा येथे आम्हाला हवी तशी मूर्ती मिळाली. यंदा त्यांच्याकडे मुर्त्या खूपच कमी आल्या होत्या आणि साचेही आले नव्हते. काही नवीन आणि हौशी मूर्तीकारांना यावेळी शाडूची माती मिळू न शकल्यामुळे मूर्ती बनविता आली नाही.
दरवर्षी नेमाने येणाऱ्या बाप्पांना यावर्षी मात्र चुकचुकल्यासारखे झाले असेल. गेले ५ महिने चालू असलेल्या करोनाच्या थैमानामुळे सगळेच चित्र पालटले होते. लॉक-अनलॉकच्या गोंधळात गणेशोत्सवाबाबतीत शासन काय निर्णय घेते, यावर खास करून मुंबईचा चाकरमानी बारकाईने लक्ष ठेवून होता. कारण होळी आणि गणपती हे दोनच सण असे आहेत की चाकरमानी गावी हजेरी लावतोच. यावर्षी गणपतीला कुटुंबासोबत तरी गावी जायला मिळणार की नाही या विवंचनेत असताना बातमी आली की गावी कोकणात जाणाऱ्यांना ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जाता येणार…कारण नियमाप्रमाणे गावी जाऊन त्यांना १४ दिवस आधी क्वारंटाईन होणे गरजेचे होते. गणपतीसाठी ५-६ दिवस सुद्धा सुट्टी मिळता मुश्किल तिथे १४ दिवस सुट्टी कशी काय मिळणार? काही जणांचं वर्क फ्रॉम होम असलं तरी गावी सगळ्याच ठिकाणी मोबाईलला, नेटला रेंज मिळेल याची शाश्वती नाही. बरं गावी जायचं तर तेही कसं?? ट्रेन चालू नाहीत, खाजगी बसेस नाहीत. खाजगी वाहन करून जायचे तर त्याचे भाडेही अव्वाच्या सव्वा. एक ना अनेक प्रश्न चाकरमान्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले आणि काहीही करून गावी जायचंच म्हटलं तर गावकरी किती प्रमाणात आपलं स्वागत करणार हाही मोठा प्रश्नच. सगळ्या शक्यतांची जुळवाजुळव सुरू असताना दुसरी बातमी येऊन थडकली की आता १२ ऑगस्टपर्यंत गावी जाता येणार. त्यामुळे बऱ्याच जणांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला (कारण आता दिवस कमी करण्यात आले होते). गावी फोनाफोनी, मेसेज करून सगळे काही विचारूनही घेतले. गावचे नियम आणि बाकी सगळ्या गोष्टीही पडताळून पाहिल्या. तरीही अजून काही चमत्कार घडतो का याचा चाकरमानी विचार करत असताना शासनाने आणखी एक निर्णय घोषित केला की, ४८ तास आधी गावी जाणाऱ्यांना करोनाची टेस्ट करून गावी जाता येणार आहे. मग काय विचारता चाकरमान्यांच्या आनंदाला उधाणच आलं आणि तो टेस्ट करून गेला सुद्धा.
इकडे शहरात गणपतीसाठीची नियमावली जाहीर झाली होतीच. त्यात मूर्तीची उंची पण – घरगुती गणपती २ फूट तर सार्वजनिक गणपती ४ फूट अशी ठरवली गेली. मूर्ती शाडू किंवा घरातील धातू किंवा संगमरवरी असावी, असाही आग्रह धरला गेला. तसं पाहिलं तर बऱ्याच आधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापले निर्णय जाहीर केले होते. काहींनी १० दिवसांऐवजी ५ दिवसच गणपती आणायचे ठरवले, तर काहींनी यावर्षी उत्सव रद्द करून तो पुढल्या वर्षी माघ चतुर्थीला साजरा करण्याचे ठरविले. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील लालबागच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही लोकहिताचा निर्णय घेतला. करोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टिकोनातून राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा केला जाईल, असं ठरवलं.
गणेश चतुर्थी जरी २२ ऑगस्टला असली तरी आमच्या घरी बाप्पाचे आगमन २ दिवस अगोदरच झाले होते. मूर्तिकारांकडे गर्दी व्हायला नको म्हणून त्यांनीही प्रत्येकाला वेळ निश्चित करून दिली होती. अपॉइंटमेंटच म्हणा ना! एका वेळी ८-१० जणांना प्रवेश दिला जाणार होता, मात्र उदबत्ती लावता येणार नाही हे निक्षून सांगितले होते. यावर्षी गणपतीच्या दर्शनासाठी कुणाच्या घरी जाता येणार नाही; त्यामुळे बऱ्याच जणींनी बाप्पाच्या व्हर्चुअल दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली. काही जणांनी स्वतःच घरी ऑनलाईन पूजा केली तर काही ठिकाणी गुरुजींनी
एकाचवेळी ५-६ गणपतींसाठी झूमवर ऑनलाईन पूजा सांगितली. दर्शन आणि आरतीच्या वेळा आधीच सांगून डिजिटल दर्शन आणि आरती साग्रसंगीत झाली. तर काही सोसायट्यांमधून एका वेळी ३-५ जणांना यायला परवागी दिली गेली. गणपती विसर्जनाचीही चोख व्यवस्था महापालिकेकडून केली गेली आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम मूर्ती संकलन केंद्र असे नवनवे पर्याय उपलब्ध करून दिले. काही जणांनी तर घरीच मूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. बाप्पाच्या आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक या दोन्ही गोष्टींवर बंदी होती हे एका अर्थी योग्यच झाले; कारण काही ठिकाणी अचकट विचकट केले जाणारे नृत्य आणि वाजले जाणारे कर्कश संगीत या सगळ्यांना आळा बसला. आमच्या बाप्पाचे विसर्जन सोसायटीच्या आवारातच झाले. त्यामुळे घरातील सर्व वयस्कर मंडळींना बाप्पाला अखेरचा निरोप देता आला. नाहीतर गर्दीमुळे त्यांना विसर्जन स्थळावर नेता येणे शक्य नसते. यावर्षी त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आनंद देऊन गेले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेली काळजी आणि नियम बाप्पानेही स्वीकारले असणार. निरोप देताना बाप्पाकडे बघताना किंचित हसत, शांत मुद्रेने तो आशीर्वाद देत असल्याचे मनोमन जाणवले / अनुभवले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या – साश्रूपूर्ण नयनांनी बाप्पाला निरोप दिला. दिड आणि पाच दिवसांचे बाप्पा आपल्या घरी गेले.
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
करोनाला संपवून या
आनंद, उत्साह घेऊन या!
© पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068