पुणे, ता. 26 : लोकमान्य टिळक प्रागतिक विचारांचे होते असे मत डेक्कन अभिमत विद्यापीठाच्या पुरातत्त्व विद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ. गो. ब. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
फर्ग्युसन महाविद्यालय व इतिहास संकलन समिती (पश्चिम प्रांत) यांच्या वतीने आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या (आयसीएचआर) सहकार्याने आयोजित केलेल्या ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान’ या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे फर्ग्युसन महाविद्यालयात उद्घाटन करताना देगलूरकर बोलत होते.
डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. पी. जामखेडकर, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले आहे.
देगलूरकर म्हणाले, ‘ब्रिटिशांमुळे समाजात निर्माण झालेला न्यूनगंड दूर करण्यासाठी आपल्या देशाचे वैभव, अभिमान, अस्मिता आणि प्राचिन काळाच्या गौरवाकडे टिळकांनी लक्ष वेधले. त्यामुळे ते ‘सनातनी’ असल्याचा गैरसमजही निर्माण झाला. मात्र, त्यांच्या विविध कृतींतून ते प्रागतिक विचारांचे असल्याचे स्पष्ट होते.’
देगलूरकर पुढे म्हणाले, ‘राष्ट्र ही भावना आहे, हा मंत्र समाजात रुजविण्यासाठी टिळक अग्रेसर होते. समाजकारण, राजकारण, धर्मकारण, क्रांतिकारकांना प्रोत्साहन देऊन विद्वत जगात अलौकिक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. त्याचबरोबर लोकशक्तिची आराधना करुन जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केले. म्हणूनच त्यांची ओळख ‘तेल्या-तांबोळ्यांचे’ पुढारी अशी झाली.’
कुंटे म्हणाले, ‘ ब्रिटिशांविरोधात विविध माध्यमांतून असंतोष निर्माण करण्याचे कार्य टिळकांनी केले. त्याचा परिणाम सैन्यामधील असंतोष जागृत करण्यात झाला. ज्या परिस्थितीत जे करता येईल ते देशाच्या स्वातंत्र्यासाठीच करेन अशी त्यांची धारणा होती. त्यांनी समाजाला जागृत अवस्थेत आणून ठेवले. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आवश्यक असा भक्कम पाया निर्माण झाला. स्वातंत्र्य मिळवून देणार्या टिळक पर्वाचा अभिमान वाटतो.’
डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक व स्वागत, डॉ. शिवानी लिमये यांनी सूत्रसंचालन, डॉ. अपराजिता मुरदे यांनी आभार प्रदर्शन केले.
अहिल्यादेवी प्रशालेत अभिव्यक्ती कार्यशाळा
डीईएसच्या अहिल्यादेवी प्रशालेत दोन दिवसांच्या अभिव्यक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बालरंगभूमीवर वैविध्यपूर्ण प्रयोग करणार्या स्वाती उपाध्ये, समुपदेशिका पल्लवी कासंडे, बाहुलींचे खेळ करणार्या सोनिया केतकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींमध्ये सभाधीटपणा, चातुर्य, वक्तृत्व आणि अभिनय हे गुण विकसित व्हावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका अनघा डांगे, उपमुख्याध्यापिका स्वाती मिश्रा, पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई, स्मिता राजगुरू, पल्लवी पारुंडेकर यांनी संयोजन केले.
नवीन मराठी शाळेत
भक्ती आणि वीर रसाचा अनोखा संगम
भक्ती रस आणि वीर रसाचा अनोखा संगम साधत डीईएसच्या नवीन मराठी शाळेत कारगिल विजय दिन आणि संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर हेमंत मावळे देशभक्तिच्या कीर्तिचा पोवाडा सादर केला. ह. भ. प. अर्चना देव यांनी कीर्तनातून संत नामदेव महाराज यांच्या कथा, अभंग, जीवन चरित्र सांगत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. चिन्मय वाईकर यांनी तबल्यावर तर पूजा अवचट यांनी हार्मोनियमवर साथ संगत दिली. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय तळपे, तनुजा तिकोने, रुपाली सावंत, मिनल कचरे, भाग्यश्री हजारे, सोनाली मुंढे यांनी संयोजन केले.