जळगाव-एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले आहे. अवघ्या दोन महिन्यांत या दूध संघाच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
गिरीश महाजनांची तक्रार
राज्य सरकारच्या या कारवाईबाबत एकनाथ खडसे म्हणाले, भाजप नेते गिरीश महाजन यांनी दूध संघाच्या कारभाराबाबत तक्रार केली होती. गिरीश महाजन आणि माझ्यामधील प्रेमाचे नाते अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळेच गिरीश महाजनांनी तक्रार करताच नगरविकास विभागाने पाऊल उचलले.
हायकोर्टात जाणार
खडसे म्हणाले, दूध संघामध्ये एका रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. त्यामुळे मी चौकशीला घाबरत नाही. मात्र, आता दोन महिन्यांत दूध संघाची निवडणूक होत आहे. केवळ दोन महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त का केले, हे समजले नाही. संचालक मंडळ बरखास्त करुन केवळ दोन महिन्यांसाठी प्रशासक नेमण्याची काही आवश्यकता नव्हती. त्यामुळे या बरखास्तीविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
राजकारणामुळेच कारवाई
केवळ राजकारणामुळे जळगाव जिल्हा दूध संघाची चौकशी केली जात असल्याचे खडसे म्हणाले. खडसे यांनी सांगितले, पूर्वी दूध संघाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यामुळे हा दूध संघ लिलावात काढला होता. इतर संस्थेकडे तो वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर सात वर्षांत दूध संघाने प्रचंड प्रगती गेली. दरवर्षी दुधाचे उत्पादन वाढले आहे. दरवर्षी संघ नफ्यात आहे. संघात एका रुपयाचाही गैरव्यवहार नाही. आतापर्यंत कारभार चांगला सुरू आहे. संचालक मंडळात सर्वपक्षीय माणसे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस अशा सर्व पक्षांची माणसे मंडळात आहेत.
उद्या पत्रकार परिषद
उद्या पत्रकार परिषद घेऊन दूध संघाच्या कारभाराबाबत सर्व माहिती देणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. खडसे यांनी सांगितले, सरकारचा चौकशीचा निर्णय आमच्यासाठी धक्का वगैरे नाही. चौकशीचा आनंदच आहे. चौकशीतून नक्की सत्य समोर येईल.