पुणे- चंद्रकांत पाटलांनी आपल्याला संपवल्यांची भाषा केलीय, अशी खंत राजू शेट्टी यांनी एका केंद्रीय नेत्यापुढे केली होती. ते पुढे म्हणाले होते की, तुम्ही चंद्रकांत पाटलांना आई -वडिलांवरून शिव्या द्या चालेल,आमची कोल्हापूरची पद्धत आहे मात्र, मोदी आणि शहांना शिव्या देणे सहन करू शकत नाही . एक किस्सा सांगताना पुण्यातील सत्कार समारंभात पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटीलांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय धुराळा उठतो आहे.पाटलांनी एकप्रकारे तुम्ही आई-वडिलांना शिवा द्या, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही बोलू नका, असा इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे.कोल्हापुरात आई वरून शिव्या देण्याची पद्धत आहे असा उच्चार त्यांनी केल्याने काही पुणेकरांना मात्र हि वक्तव्ये रुचलेली नाहीत .त्यामुळे सोशल मीडिया वरून यावर टीका सुरु झाली आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुणे भाजपकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हे वक्तव्य केले. ते म्हणाले, आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी आणि शहांना शिव्या दिलेले चालणार नाही. त्यामुळेच तुम्ही हातकंणगलेमधून लोकसभेला पडलात, असे एका केंद्रीय नेत्याने आपल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते असणाऱ्या राजू शेट्टी यांना सांगितल्याचा दावा पाटलांनी केला.
दिल्लीतील लोकांनी उमेदवारी देताना उगाच पुण्यातून उमेदवारी दिली नाही. त्यामागे काही कारणे आहेत. मात्र, सत्ता गेल्याने अडीच वर्षे आपल्याला काही करता आले नाही. आता सातारा, सांगली, पुणे, सोलापूर सगळे साफ करायचे आहे, असे म्हणत विरोधकांना इशारा दिला आहे.राजू शेट्टींना लोकसभेच्या वेळेस वाटत होते की, आपला पराभवच होऊ शकत नाही. मात्र, त्यांना सव्वालाख मतांनी मी प्रदेशाध्यक्ष असताना हरवल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले. माढ्यातून स्वत: पवार उभे राहणार होते काय झाले? आमच्या निंबाळकरांना 84 हजार मतांनी निवडून आणले, असे म्हणत आपल्या पुण्यात येण्यामागे भाजपने पुण्यात लक्ष घातले असून आता पवारांचा बालेकिल्ला आपण काबीज करणार, असा इशाराच पाटील यांनी दिला आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शंभर नगरसेवक निवडून आले तरच, भाजपने पुणे महापालिका जिंकली असे मी मानेन.९९ नगरसेवक आल्यावर महापौर आपला होईल; पण भाजपने महापालिका जिंकली असे मी कधीच म्हणणार नाही. त्यामुळे आपापसांतील भांडाभांड बंद करा, अशा स्पष्ट शब्दांत यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले..गेल्या अडीच वर्षांत भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांनी मोठा त्रास दिला. तरीही भाजपचे कार्यकर्ते टिकून राहिले. फडणवीस सरकारचे निर्णय रद्द करणे व खुन्नस काढणे एवढेच काम त्यांनी केले. परंतु, या काळात हे सरकार कसे जाईल असे आमचे नियोजन चालूच होते व शेवटी ते खरे झालेच. आता पुढील काळात खूप मोठी आव्हाने पेलावी लागणार असून, शहरातील रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, जायका प्रकल्प पूर्ण करणे, रिंग रोड, मेट्रो, आदी कामांसाठी अठरा-वीस तास कामाची तयारी सर्वांनीच ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.बाहेरचा आला म्हणून हिणवले; पण फरक नाहीकोल्हापूरहून येऊन पुण्यात कोथरूडमधून निवडणूक लढवून लाखो मतांचा मेवा मिळविला, असा आरोप करीत मला बाहेरचा म्हणून बाेलतात. याबाबत अनेकांनी मला विचारले की, तुमच्या मनात याची खदखद आहे का? परंतु, मी याकडे अधिक लक्ष देत नाही. मी याच्याकडे एक खेळ म्हणून पाहतो, असे स्पष्ट करीत पाटील यांनी, मी वरिष्ठांच्या आदेशानुसार पुणे व परिसर जिंकण्याचे टार्गेट घेऊन येथे आलाे असल्याचे सांगितले.
‘पुणे शहर – स्वच्छ शहर सुरक्षित शहर’ हा माझा संकल्प आहे. तरीही माझ्या निवडीच्या अभिनंदनाचे फ्लेक्स शहरभर लावले गेले. शहर विद्रूपीकरणात अशाच अनधिकृत फ्लेक्सचा मोठा हातभार असतो. तुम्हाला एवढीच हौस असेल तर अधिकृत बोर्ड भाड्याने घेऊन तेथे दहाऐवजी दोनच फ्लेक्स लावा, असे परखड मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच माझ्या कार्यक्रमात यापुढे फटाके वाजविले तर मी गाडीतून न उतरताच परत जाईन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.