काँग्रेसचा दुटप्पीपणा व कांगावा लक्षात आणून देण्यासाठीच लाक्षणिक उपोषण-खा.काकडे
हजारो कार्यकर्त्यांसह खासदार काकडेंची उपोषणस्थळी एंट्री!
खासदार शिरोळेंच्या उपोषणास खासदार काकडेंचा हजारो कार्यकर्त्यांसह पाठिंबा
पुणे : संसदेमध्ये संसदीय लोकशाहीप्रमाणे काँग्रेस पक्षाचे खासदार काम करीत नाही व सरकारच्या कामात अडथळा निर्माण करतात. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांच्या प्रत्येक निर्णयासंबंधी संसदेमध्ये चर्चेस तयार असते. परंतु, काँग्रेसला चर्चाच नको असते. काँग्रेसचा हा दुटप्पीपणा व कांगावा देशातील जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठीच आज भाजपाच्या खासदारांनी आपापल्या मतदार संघात एक दिवसाचे उपोषण केले आहे, असे राज्यसभेचे खासदार व भाजपाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी सांगितले.
खासदार संजय काकडे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह येऊन पुण्याचे भाजपाचे खासदार अनिल शिरोळे यांच्या उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे केंद्रात स्पष्ट बहुमत आहे. तरीदेखील संसदीय लोकशाहीप्रमाणे संसदेत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे. मात्र काँग्रेस सभागृहात गोंधळ घालते. असे असुनही लोकशाहीच्या तत्वानेच सरकार चालविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. देशातील जनतेला काँग्रेसचा हा दुटप्पीपणा व कांगावा लक्षात आणून देण्यासाठीच भाजपाच्या सर्व खासदारांनी आपापल्या मतदार संघात एक दिवसाचे उपोषण केले आहे.
दकम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या हल्ला बोल आंदोलनाविषयी खासदार संजय काकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सलग 15 वर्षे सत्तेत होती. त्यावेळी जर त्यांनी जनतेची कामे केली असती, ते जनतेत गेले असते आणि विकासाची कामे केली असती तर, त्यांच्यावर हल्ला बोल आंदोलनाची वेळच आली नसती. अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जात असल्याबाबत विचारल्यावर खासदार काकडे म्हणाले की, अजित पवार, सुप्रिया सुळे व धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा भावी मुख्यमंत्री म्हणून चालविली जाते. परंतु, मुख्यमंत्री होण्यासाठी राष्ट्रवादीला राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनावा लागेल. जे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आता बोलणे योग्य नाही.