संभाजी महाराजांच्या जयघोषात पुरंदर ते वढू-तुळापूर पालखी सोहळ्यास प्रारंभ
पुरंदर :
छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 316 व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय पालखी सोहळ्याचे दिनांक 5 एप्रिल ते 7 एप्रिल 2016 या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या पालखी सोहळ्यास आज (मंगळवार) जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, संयोजक संदीप भोंडवे यांच्या हस्ते आरती, पादुका पूजन करून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.
सोहळ्याला उपस्थित 3 हजार युवकांनी तुतार्यांचा निनाद, संभाजी महाराजांचा जयघोष करून पुरंदर किल्ला दणाणून टाकला. महिलांचे पथकही फेटे, तलवारी घेऊन सहभागी झाले होते. यावेळी भजनी मंडळांचाही सहभाग होता. यावेळी शिल्पा तुपे (पालखी समिती सदस्या) उपस्थित होत्या.
नारायणपूरपासून चांदीचा रथ पालखी सोहळ्यात समाविष्ट झाला. नारायण आण्णा महाराज यांच्या हस्ते पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. पुढे पालखी सोहळा सासवडकडे मार्गस्थ झाला. सासवड येथे नगरसेवक वामनतात्या जगताप व मित्रमंडळी यांच्यावतीने अन्नदान (भोजन) करण्यात आले. पुढे पालखी सासवड येथून वडकी येथे पोहोचली. पै.पंडीतमामा साबळे व ग्रामस्थ यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. वडकी येथे पालखी मुक्काम करणात आला होता.
वडकी मुक्कामी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवव्याख्याती मेघा माने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संयोजक संदीप भोंडवे आणि सोहळ्याचे सल्लागार अॅड. गणेश सातपुते यांनी दिली.
उद्या बुधवार, दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता वडकी येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे. सकाळी 10 वा. हडपसर, दुपारी 1 वाजता मांजरी, दुपारी 3 वाजता मांजरी वरून प्रस्थान करून पालखी सायंकाळी 7 वाजता वाघोली येथे येणार आहे. पालखी वाघोली येथे मुक्काम करणार आहे. वाघोली मुक्कामी महेंद्र महाडिक लिखित ‘छावा’ नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी भक्तांच्या सेवेसाठी वाघोली येथील सुश्रुषा हॉस्पिटलची टीम व रुग्णवाहिका असणार आहे.
धवलसिंह मोहिते पाटील (अकलूजचे रहिवासी, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य) यांच्या अश्वाला पालखी सोहळ्यात मान देण्यात आला आहे. तर या वर्षीच्या पालखी सोहळ्याच्या रथाच्या बैलजोडीचा मान फुरसुंगी येथील उद्योजक आप्पा खुटवड यांना देण्यात आला आहे.
‘धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा समिती’च्या वतीने संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘अभिमान गीत’ तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘धर्मवीर संभाजीमहाराज अभिमान गीत’ सीडीचे प्रकाशन करण्यात आले. लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळ रेडिओवर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे वर्णन करणार्या ‘अभिमान गीता’चे प्रसारण करण्यात आले. नंदेश विठ्ठल उमप यांनी हे गीत गायले असून, सात्विक ठकार यांनी लिहिले आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे वर्णन असे या ‘अभिमान गीता’चे स्वरूप आहे, अशी माहिती महेंद्र महाडिक (पालखी सोहळा समिती सदस्य) यांनी दिली.