पुणे – महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड आगामी पुणे लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी पुण्यात लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भातली घोषणा करण्यात आली. संभाजी ब्रिगेडकडून लोकसभेसाठी 40 जागांवर तर विधानसभेसाठी 100 जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत.
या वेळी संभाजी ब्रिगेडकडून मोदी सरकारवर टीका करण्यात आली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, सुशिक्षित बेरोजगार तरुण, छोटे-मोठे लघु-मध्यम व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना उध्वस्त करून संपविण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. राज्यातही देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्वसामान्यांच्या जीवावर उठले आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने कंबर कसली असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी सभागृहात भांडायला कोणीही उरले नाही. अशा परिस्थितीत संभाजी ब्रिगेड सामान्यांचा आवाज म्हणून सभागृहात जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यासह देशात प्रस्थापित आणि जातीय विद्वेषामुळे राजकारणात तरुण चेहऱ्यांना संधी द्यायला कोणी तयार नाहीत. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असून राज्यातही अशाच प्रकारे राजकारणात चांगले काम करून संभाजी ब्रिगेड आपली स्वतःची जागा निर्माण करणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले. तसेच आगामी मनपा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही संभाजी ब्रिगेड उतरणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
शेतकरी प्रश्न, दारूबंदीचा प्रश्न, झोपडपट्टी विरहित शहर, पाणीप्रश्न, चांगले रस्ते, धर्मनिरपेक्ष समाज यांसारख्या मुलभूत प्रश्नांवर संभाजी ब्रिगेड भर देणार असून विधानसभेच्या तसेच लोकसभेच्या जागेवर ५० टक्के महिलांना संधी देण्यात येणार आहे. शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण हे ब्रीद घेऊनच संभाजी ब्रिगेड शेतकरी तरुणांच्या मुलभूत प्रश्नांवर रणांगणात उतरणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. संभाजी ब्रिगेडकडे राज्यभरामध्ये सक्षम पर्याय उपलब्ध असून नवीन मतदारांचा हक्काचा आवाज म्हणून संभाजी ब्रिगेडकडे अनेकांचा ओढा असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.