पुणे-अभिनेत्री, निर्माती, कवयित्री भाग्यश्री देसाई यांच्या ‘आषाढ’ या त्रैभाषिक काव्यसंग्रहाला नुकताच चौथा मानाचा पुरस्कार मिळाला. शब्दांगण साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा “चैतन्य शब्दांगण साहित्य गौरव पुरस्कार” देसाई यांना नुकताच प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रा.भीमराव धुळूबुळू, डॉ. यशवंत पाटणे, गौरी भोगले, सुप्रिया वकील, राजेंद्र नागरगोजे, नामदेव भोसले, ऋजुता माने आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी भाग्यश्री देसाई त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की ‘आषाढ’ या माझ्या काव्यसंग्रहाला शब्दांगण साहित्य पुरस्कार आपण दिल्याबद्दल आपली मी ऋणी आहे. मी नामदेव भोसले आणि इतर मान्यवरांचे आभार मानते. हा पुरस्कार म्हणजे माहेरचा आहेर असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
नामदेव भोसले यावेळी म्हणाले की भाग्यश्री देसाई यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार देवून आम्हाला आनंद झाला. कारण ‘आषाढ’ हा काव्यसंग्रह दर्जेदार असून त्यातील कविता मनाचा आणि अंतर्मनाचा ठाव घेतात. योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाल्याच आम्हाला समाधान आहे.