पुणे-31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमितीकरण करणेबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 6 जानेवारी 2021 रोजी जाहीर केला, त्यानंतर मार्च महिन्यात अधिवेशनात यासंबंधीचा कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर 21 एप्रिल ला स्थायी समिती ने देखील याबाबत चा निर्णय जाहीर केला.
मात्र अद्याप पर्यंत प्रशासनाने गुंठेवारी नियमितिकरणाची प्रक्रिया सुरु केली नसल्याने याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मनपा आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली व नियमितिकरण प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, राजेंद्र राऊत उपस्थित होते. हे नियमितिकरण रखडल्यामुळे ह्या निर्णयाचा लाभ अद्याप पर्यंत सर्वसामान्यांना मिळालेला नाही हे चंद्रकांतदादा यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याद्वारे अनेक वर्षे अडकलेल्या सामान्य नागरिकांना दिलासा ही मिळेल असे सांगतानाच हजारो सामान्य सदनिकाधारकांची परिस्थिती अत्यन्त गंभीर असून नियमितिकरण न झाल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत,एकीकडे कर्ज काढून घेतलेल्या घराचे हप्ते सुरु असून काहींना ताबा मिळालेला नाही तर काहींचे मंजूर गृहकर्जाचे वितरण (disbursement) होत नसल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत असे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असता मा. आयुक्त विक्रमकुमार यांनी यास अनुकूलता दर्शविली. मात्र उच्च न्यायालयाच्या 2017 मधील एका निकालाचा संदर्भ देत सरसकट गुंठेवारी नियमितिकरणात या आदेशाचा अडसर असून त्याबाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे ही त्यांनी सांगितले – मात्र जी बांधकामे मनपा च्या डी सी रुल नुसार नियमितिकरणास पात्र आहेत त्यांची प्रक्रिया त्वरित सुरु करू अशी ग्वाही त्यांनी दिली.आयुक्तांच्या निर्णयावर आ. चंद्रकांतदादा यांनी समाधान व्यक्त केले.