देवा तुझे किती । सुंदर आकाश
सुंदर प्रकाश । सूर्य देतो…
लहानपणी ऐकलेली ही कविता आता पुन्हा वाचायला, ऐकायला मिळतेय. व्हाट्सअपवर जवळजवळ सर्वच ग्रुपवर ही व्हायरल झाली आहे. कारणही तसंच आहे म्हणा. सध्या या कवितेतील ओळी प्रत्यक्ष अनुभवता येत आहेत. कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला आणि काही चांगले परिणामही दिसू लागले. त्यापैकीच हा एक परिणाम सुंदर आणि नितळ आकाश दिसण्याचा. सगळीच वाहनं जागच्या जागी थांबली आहेत, स्टॅच्यू म्हटल्यासारखी. प्रदूषण कमी झालं आहे. सकाळी सकाळी असलेले धुरांचे लोट जाऊन आता शुभ्र निरभ्र आकाश दिसतंय. माझ्या नात्यातील अद्वैत पाटील व त्याच्या आईला निलाक्षीला छायाचित्रणाचा छंद आहे. त्यांनी आकाशाच्या विविध छटा त्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या आहेत.
अर्थात केवळ आकाशच शुभ्र दिसत नाही तर इतरही चांगले बदल घडून येत आहेत. माणसांचा वावर आणि प्रदूषण नसल्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात या हंगामात फ्लेमिंगोच्या (रोहित पक्षी) संख्येत जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी फ्लेमिंगोचे आगमन उशिरा झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्या मात्र वाढली आहे. दक्षिण मुंबईत मलबार हिल, केम्स कॉर्नरच्या परिसरातील नागरिक तर एक सुखद अनुभव घेत आहेत. राजभवनाच्या विस्तीर्ण परिसरात नेहमीच मोरांचा वावर असतो. मुंबईचे रस्ते मोकळे झाल्यानं आणि नेहमीचा कोलाहल नसल्यानं मोरांनीही राजभवन सोडून आजूबाजूच्या परिसरात आता भटकंती सुरू केली आहे. एवढंच नाही तर सतत पर्यटकांची गर्दी असलेल्या नॅशनल पार्कमध्येही असेच काहीसे दृश्य आहे. नॅशनल पार्कमधील चिंचपाड्यात राहणाऱ्या नितेशने सांगितले की हरण, सांबर, ससे मस्तपैकी पार्कातील रस्त्यांवर बिनधास्त फिरताना दिसतात.
मुंबईसारखीच परिस्थिती दिल्लीत देखील तेथील नागरिकांना पाहायला मिळाली. नोएडा इथल्या जीआयपी मॉलजवळ नीलगायने हजेरी लावली तर केरळमधल्या कलीकट इथं रस्त्यांवर सिव्हेट हा प्राणी हुंदडताना दिसला. दिल्ली आणि मुंबई ही सगळ्यांत जास्त प्रदूषण असणारी शहरे आता हळूहळू ग्रीन झोनमध्ये बदलत असल्याचे दिसून आले आहे. फुफ्फुस, अस्थमा आणि हृदयविकार असणाऱ्यांना श्वास घेताना होणारा त्रास कमी झालाय.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान गंगा नदी स्वच्छ दिसू लागली आहे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालाय – त्यात देवभूमी उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील गंगा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ दिसत आहे. लॉकडाऊनमुळे औद्योगिक प्रदूषकांची संख्या कमी झाली असून घाटांवर पर्यटकांच्या अनुपस्थितीमुळे गंगा नदीतील प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. लक्ष्मण झुलाजवळ घेतलेल्या या व्हिडिओमध्ये गंगेचे पाणी स्वच्छ, स्वच्छ आणि स्वच्छ दिसत आहे.
पृथ्वीचं सुरक्षा कवच आणि धोकादायक अतिनील किरणांपासून बचाव करणारा ओझोनचा थर पूर्ववत होत आहे.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामरूपपर्यंत भारतामध्ये एरव्ही श्वास घेणेही ज्यामुळे अवघड होत होते त्या प्रदूषणाची पातळी गेले काही दिवस लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे कमी झाली आहे. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाची वाढ रोखण्याची आणि त्या सकारात्मक परिणामांसाठी दीर्घकालीन उपाय योजण्याची आवश्यकता आहे.
दरवर्षी 22 एप्रिलला ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जातो, या दिवशी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ठिकठिकाणी प्रदर्शनं, निदर्शनं तसेच स्वच्छता मोहीमा हाती घेतल्या जातात. यावेळेचा पृथ्वीदिन मात्र वेगळाच होता. कोरोना विषाणूच्या साथीचं संकट जगभरात पसरलं आहे. निसर्गाने आपली किमया दाखवून हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा केलाय हेही खरं. हे सुंदर चित्र (म्हणजे प्रदूषणविरहीत निसर्ग ) कायम राहावं असंच वाटतं.
निरभ्र आकाश, स्वच्छंदीपणे उडणारे पक्षी, स्वच्छ नद्या असे हे दृश्य सुखावणारे असले तरी उद्योगधंदे, कारखाने बंद, वाहन प्रवास बंद अशी परिस्थिती सातत्यानं असणं कोणत्याही विकसनशील देशाला कायमस्वरूपी परवडणारं नाही. निसर्गाच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. तेव्हा कुठे ही धरती, हे पाणी आणि आकाश नेहमी स्वच्छ , निरभ्र आणि सुंदर दिसेल. अगदी कवितेतल्या ओळींसारखं हे जग आपल्या पुढच्या पिढीलाही प्रत्यक्ष अनुभवता येईल…!
- देवा तुझे किती । सुंदर आकाश
- सुंदर प्रकाश । सूर्य देतो…
© पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068