उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही, अजूनही…
कुसुमाग्रजांच्या कवितेतील ह्या ओळी आजकाल रोज सकाळी प्रत्यक्षात अनुभवायला येताहेत. उजाडायची खोटी की चिऊताई चिवचिवाट करत ग्यालरीतल्या ग्रिलवर येऊन बसते. खूप वर्षांनी हे दृश्य नजरेस पडत आहे. माझ्या ओळखीतल्या श्रद्धा शिंदेनी सांगितले की, आता चिमण्या केवळ अंगणातच नाही तर खिडकीतून घरातही येऊ लागल्या आहेत. गंमत म्हणून लगबगीने चिमण्यांचा एक फोटोही त्यांनी पाठवून दिला. तसेच वाशीचा प्रेमानंद बिराजदार चिऊताईसाठी घरटे बनवून ती कधी राहायला येतेय याची प्रतीक्षा करतोय.
लॉकडाऊनमुळे माणसं घरात बसली आहेत आणि निसर्गाचं अधिराज्य सुरू झालं आहे. पक्ष्यांचा किलबिलाट तर नित्य ऐकू येतोच आहे पण आपल्या सगळ्यांचीच बालपणाची एक खूण म्हणजे चिऊताईंचं दर्शन रोज घडत आहे. इतके दिवस कुठे लपून बसली होती देव जाणे!
मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या ‘चिऊताई चिऊताई, चिऊताई दार उघड’ या कवितेत चिऊला आर्जव केलंय-
वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
दार उघड, दार उघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
खरंच, लपून बसलेली चिऊताई आता घरट्याचं दार उघडून बाहेर आली आहे आणि रोज तिचा चिवचिवाट मनात रुंजी घालतोय. जणू काही, आपल्या बालपणीच्या चिऊ-काऊच्या आठवणी सांगत ती आपल्याशी बोलतेय, असाच भास होतोय. आताच्या पिढीला काऊ-चिऊच्या गोष्टीची आठवण करून देते- एक असतो काऊ. एक असते चिऊ. काऊचं घर असतं शेणाचं. चिऊचं घर असतं मेणाचं. एकदा किनई खूप मोठा पाऊस येतो आणि मग…चिऊ-काऊची गोष्ट लहानपणी ऐकली नाही असा एकही बाळ सापडायचा नाही. चिमणी…माणसाच्या अगदी हातभर अंतरावर बागडणारा हा पक्षी भारत तसेच पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंकेसह इतर अनेक देशांतही आढळतो. चिमण्यांचे आयुष्य साधारणतः सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. चिमण्या सहसा ताशी 24 मैलांच्या वेगाने उड्डाण करतात. आवश्यक असल्यास (धोक्याच्या बाबतीत) त्या ताशी 31 मैलापर्यंत वेग वाढवून उडू शकतात. इवल्याशा या पक्ष्याबद्दलची ही माहिती थक्क करणारी आहे.
गवत, कापूस, पिसे अशा मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, अडगळीची जागा, झाडांवर असे कुठेही घरटे बांधणारा हा पक्षी कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. पूर्वी घरात चिमण्या असल्या की पाली, कातिणींचे जाळे, किडे, किटक, अळ्या फारसे दिसायचे नाही. ही घाण चिऊताईच स्वच्छ करायची. जुन्या चाळी, घरं जाऊन चकचकीत ब्लॉक्स आले आणि त्यासोबत ग्रीलच्या विंडोही. अहो, चिऊताईला आपणच आपल्या घराची दारं बंद करून टाकली.
पूर्वी लहानग्यांना घरातील मोठी माणसं जेवण भरवताना चिऊ-काऊचा घास भरवायचे. आता चिऊ-काऊ जाऊन त्यांची जागा कार्टूनमधल्या शिनचॅन, डोरेमॉनने घेतली आहे; काही घरांत ‘मी तुला हवं तर मोबाईलवर देते खेळायला, ते खेळत खेळत जेव हं’ असेही सांगितले जाते. सगळी परिस्थितीच आमूलाग्र बदलून गेली. पूर्वी घरांना मोठ्या नसल्या तरी दोन दारं असलेल्या मोकळ्याढाकळ्या खिडक्या असायच्या. स्वयंपाक झाला की आई किंवा आजी खिडकीजवळ पोळीचा तुकडा, भात आठवणीने ठेवायच्या. काऊ-चिऊ नेमके येऊन बसायचे ते खायला. मग त्यांच्यासोबत लहान मुलांचेही जेवण व्हायचे. आता ब्लॉकच्या खिडक्या…खरं तर विंडो असतातच मुळी ग्रिल किंवा जाळीने बंदिस्त. त्यात कुठे ठेवणार पोळीचा तुकडा नी भात. नकळत आपणच काऊ-चिऊला आपल्यापासून दूर केलं आणि त्यांचं अस्तित्व हळूहळू कमी होऊ लागलं.
चिऊताईला हवी तशी इकोफ्रेंडली घरे नाहीत आणि पोषक वातावरणही नाही. पूर्वी सर्वत्र आढळणारी ही चिऊताई सध्या दुर्मिळ पक्षी बनली आहे. त्यांच्या पक्षीसंख्येला धोका निर्माण झाला आहे. चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. २० मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो.
चिऊ हळूहळू दिसेनाशीच झाल्यावर चिमण्यांसाठी दाणे असलेले दाणेपात्र, पाणीपात्र इत्यादी आवर्जून गॅलरी, घरातील एखादे मोठे झाड, गच्चीवर ठेवली जाऊ लागली…परंतु, रागावलेली चिऊताई एवढ्या सहजपणे या पात्रांकडेच नव्हे तर पाणी पिण्यासाठीही येईनाशी झाली.
त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी काहींनी विकत घेतली असून अशी घरटी विकणारेही रस्त्यांवर उभे दिसताहेत. मात्र चिऊ ही ऐतखाऊ नाही. तिला स्वत:च्या परिश्रमाने काड्या, धांड्यांपासून विणलेले हक्काचे घरटे हवे, असे प्रांजळ मत पक्षीप्रेमींनी व्यक्त केले आहे.
आता बघा, लॉकडाऊनमुळे समस्त मानवजात घरात बंदिस्त झाल्यावर कुठे तरी दडून बसलेली चिऊताई मात्र बाहेर पडली आहे. पूर्वी सारखाच मुक्त संचार आणि चिवचिवाट आसमंतात घुमतो आहे, निनादतो आहे. ती बघ चिऊ…चिऊ आली…चिऊ आली…लहान मुलांना चिऊ बघण्याचं भाग्य लाभत आहे. चिऊ-काऊची गोष्ट पुन्हा नव्याने सांगितली जातेय. दारात येणाऱ्या चिमण्या चिवचिवाटाने आपल्याशी पुन्हा सवांद साधताहेत.
गीतकार शंकर रामाणी यांनी त्याच्या गीतात वर्णन केल्याप्रमाणे-
माझिया दारात चिमण्या आल्या
अबोल काहीसे बोलून गेल्या…
© पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068