पुणे-दिल्ली आणि वरिष्ठ हाय फाय सोसायटीत रमणाऱ्या वंदना चव्हाण यांना खूप संधी दिली ,आता थेट सामान्य जनतेशी नाळ असणाऱ्या लोकनेत्यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद द्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे . सामान्य कार्यकर्ता आणि चव्हाण यांच्यात असलेला दुरावा आता त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा पक्षनेतृत्वाने खासदारकीची संधी दिल्याने उफाळून आला आहे .विशिष्ट लोकांशीच संपर्क ठेवणे,सामान्य,मेहनती कार्यकर्त्यांना किंमत न देणे अशा आरोपांसह जनतेशी नाळ त्यांची राहिलेली नाही असा मुख्य आरोप चव्हाण यांच्यावर केला जातो आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण या आठ वर्षांपासून शहराध्यक्षपदांवर विराजमान आहेत. त्यांना पुन्हा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे त्यामुळे शहराध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी राष्ट्रवादीमध्ये जोर धरू लागली आहे.
पुण्याच्या शहराध्यक्षांमध्ये बदल केला जावा, अशी मागणी 2016 पासून केली जात आहे. या पदासाठी पालिकेतील माजी उपमहापौर आणि नगरसेवक दीपक मानकर, माजी सभागृहनेते आणि विद्यमान नगरसेवक सुभाष जगताप, माजी महापौर प्रशांत जगताप अशी अनेक नावे चर्चेत आहेत.मात्र या पैकी कोणीही कधीही स्वतः अशा रेस मध्ये येण्याचे टाळले आहे हे विशेष .
पूर्वीदेखील राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या पुण्यातुन विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर पालिका निवडणुकांपूर्वी शहराध्यक्ष बदलण्याच्या मागणीने जोर धरला होता. शहरातील इतर सर्वच पक्षांच्या अध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने राष्ट्रवादीमध्ये खांदेपालट होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती.अखेरच्या टप्प्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पालिका निवडणुकांपर्यंत शहराध्यक्षपद वंदना चव्हाण यांच्याकडे कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती . गेल्या वर्षी पालिका निवडणुकांनंतर त्यांनीच नैतिक जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. पक्ष नेतृत्वाने तो स्वीकारला नाही आणि नव्याने कोणाची नियुक्ती करण्यासाठी पावले उचलली नाहीत. आता पुन्हा एकदा शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे.