पुणे- गायन, वादन, नृत्य यांचा मनोहरी संगम असणाऱ्या केरळोत्सवातील बहारदार सांस्कृतिक
कार्यक्रमांनी केरळ संस्कृतीचे दर्शन घडवीत उपस्थितांचे मने जिंकली. या महोत्सवाला पुण्यातील
मल्याळी नागरिकांसह शेकडो पुणेकरांनी हजेरी लावत या महोत्सवाचा आनंद लुटला. जेष्ठ
अभिनेते जितेंद्र हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. माझ्या आणि माझ्या मुलीच्या
यशामध्ये मल्याळी व्यक्तींची महत्वाची भूमिका असल्याचे जितेंद्र यांनी यावेळी सांगितले.
पुणे फेस्टिवल अंतर्गत पुणे मल्याळी फेडरेशनच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘केरळोत्सवाचे’
आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने
झाले, त्यावेळी ते बोलत होते. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, श्री युवराज निंबाळकर, पुणे
मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर, फेडरेशनचे उपाध्यक्ष एम् एन. विजयन, सचिव ए. के.
जाफर, सहसचिव विजय कुमार व शशिधरण, माजी अध्यक्ष टी. पी. विजयन, केरळी समाजाचे
अध्यक्ष मधू नायर, समन्वयक गोपी नायर, फेडरेशनच्या महिला सेलच्या चिटणीस विजया
सरसम्मा, सह्समन्वयक जी. पी. नायर, वासू नायर, जगमोहन नायर, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे आदी
यावेळी उपस्थित होते.
अभिनेते जितेंद्र म्हणाले, आमच्या काळात अभिनेत्याचा चेहरा हा आमचे दुकान होते. अभिनेत्याचा चेहरा
अगोदर आणि त्यानंतर त्याचा अभिनय बघितला जायचा. माझा रंगभूषाकार हा केशवन नायर होता. माझ्या
मुलीची बालाजी टेलिफिल्म हे कंपनी आहे. त्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी समीर नायर आहे. त्यामुळे
माझ्या व माझ्या मुलीच्या यशामध्ये मल्याळी व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आजच्या या केरळ
महोत्सवाला मला उपस्थित राहायला मिळाले याचा विशेष आनंद आहे.
सुरेश कलमाडी म्हाणाले, पुणे फेस्टिवलला २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुणे हे कॉस्मोपोलीटीन शहर आहे.
मल्याळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे फेस्टिवलचे पुढचे ३० वे वर्ष आहे. पुढील वर्षी यापेक्षाही जास्त
मोठा केरळ महोत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले .
आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये राजन नायर म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक
गणेशोत्सव सुरु करून त्यामाध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याचप्रमाणे पुण्याचे नाव
जगाच्या नकाशावर झळकावे असे स्वप्न सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून
पाहिले आणि त्यांनी ते साकार केले. महाराष्ट्रातील जनता व केरळ मधील जनतेमध्ये बंधुत्वाचे
तसेच सर्वधर्म समभावाचे नाते निर्माण करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश केरळ महोत्सवातून दिला
जातो असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी गणेश वंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर केरळीयम या नेत्रदीपक
कार्यक्रमातून केरळी संस्कृतीचे, कलेचे दर्शन घडले. राजा महाबली व वामन यांच्या पौराणिक
कथेवर आधारित वामन अवतार या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. ख्रिश्चन समाजाची
महानता दर्शविणारे आणि सेंट थॉमस यांच्या जीवनावरील व केरळमधील कार्यावर आधारित
‘मार्गम कली’, केरळातील मुस्लीम ख्रिश्चन समाजाच्या ऐक्याचे दर्शन घडविणारा ‘ओपन्ना’ या
कार्यक्रमांच्या सादरीकरणाने राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचे दर्शन घडवीत उपस्थितांची
मने जिंकली. याशिवाय सर्व वयोगटातील मुलामुलींनी सादर केलेले भरतनाट्यम व शास्त्रीय
संगीताचे फ्युजन, तिरुवतिरा हे पारंपारिक नृत्य, कुचीपुडी नृत्य, भारत नाट्यम, कथ्थक, शास्त्रीय
नृत्य तसेच ‘लावणी महोत्सव’, ‘सिनेमॅटीक डान्स’, ने उपस्थितांची वाहवा मिळवली.
पुणे मल्याळी फेडरेशनच्या महिला सेलच्या सचिव विजया सरसम्मा यांनी सूत्रसंचालन केले