एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे यश
पुणे,दि.११: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंचलित ई-रथ वाहनाची निर्मिती केली आहे. रिमोट ड्रायव्हेबिलिटी आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग क्षमता असलेली चार चाकी ई-रथ इलेक्ट्रिक वाहन यशस्वीरित्या डिझाइन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, इंजिनिअरींग विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ. भरत चौधरी, डॉ. अनिल हिवाळे, डॉ. विनया गोहोकर, डॉ. अनुराधा फडके, डॉ. सुनिल सोमाणी व डॉ. जी.एन.मुळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या वाहनाची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मिरज इनामदार, प्रज्वल वेर्णेकर, साईबाबा नरगुंद, प्रथमेश वाणी सहित मेकॅनिकल विभागाचे विद्यार्थी अद्वैत उटगीकर, सौमित्र महाजन व पूर्वा अपराज यांनी केली आहे. यांना डॉ अल्का एस. बारहत्ते आणि प्रा. पी.एस. महाजनी यांनी मार्गदर्शन केले.
ई-रथ मॅन्यूअल ड्राइव्ह तसेच संगणक आणि रेडिओ नियंत्रणाद्वारे रिमोट ड्राइव्ह करण्यास सक्षम आहे. यात ओपन डिफरेंशियल एक्सल असलेली इलेक्ट्रिक मोटर असून जी ड्रम ब्रेक सह येते. याची ऑनबोर्ड लोड क्षमता २०० किलोग्रॅम आणि टोइंग क्षमता ३०० किलोग्रॅम आहे. ३० किमी प्रतितास वेगमर्यादा असून यात डयुअल अॅप्लिकेशन मेकॅनिझममुळे अद्वितीय ब्रेक असेब्ली आहे. त्यामुळे मॅन्युुअल आणि रिमोट दोन्ही मोडमध्ये बोल्ट ऑफ प्रक्रियेसह हे वाहन वापरले जाऊ शकते.
ओसीएम इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टीयरिंग सिस्टम याची विशेषता आहे. दिशा नियंत्रित करण्यासाठी रिमोट मोडमध्ये अखंडपणे वापरली जाऊ शकते. थ्रॉटल यंत्रणा दुहेरी चॅनल प्रणालीमध्ये देखील सुधारणा केली गेली आहे. यात भौतिक पेडल्स व ऑनबोर्ड संगणकावरून इनपूट प्राप्त होते. यामुळे वाहनाचे लोकोमोशन सोपे व अधिक कार्यक्षम बनते.
विद्यार्थी प्रज्वल वेर्णेकर म्हणाला,“ विद्युत वाहन निर्मितीमध्ये अनेक नावीन्यपूर्ण संशोधन होत आहे. तोच प्रयत्न आम्ही केला आहे. माझ्यातील ऑटोमोटिव्ह संदर्भातील ज्या कल्पना आहेत त्याला सत्यात उतरविण्यास आकार दिला गेला आहे.”
मिराज इनामदार म्हणाला,“ ही माझ्यासाठी एक उत्तम संधी होती. वाहनांमधील बदल पाहताना मॅन्युअल ते स्वायत्ता असा बदल ही आता दूर नाही. कमी कालावधीत, मार्यादित निधी आणि प्रत्येक पायरीवरील गुंतागुंत लक्षात घेतली आहे. मला मिळालेल्या संधी बद्दल आभारी आहे.”
साईबाबा निरगुड म्हणाला,“ या प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये आमूलाग्र बदल करूनही, विविध यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि सॉफ्टवेअर प्रणालीच्या एकत्रिकरण आणि अंमलबजावणी करणे एक मोठे आव्हान आहे. ”