राजकारण शरद पवारांचे !
शरद पवार हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील धुरंधर राजकारण्यांपैकी एक आहेत. ते एका दगडात अनेक पक्षी मारतात असे म्हणतात. परंतु परवा पुण्यातील मुलाखतीत त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. काही विधान पवारांनी जाणूनबुजून केल्याचे जाणवले.
त्यापैकी त्यांचे एक महत्वाचे विधान म्हणजे ” आरक्षण हे जाती पातीवर न देता आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यांना द्यावे,तसेच हे करीत असताना मूळ दलित व आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये”.
मला असे वाटतं हे विधान पवारांच्या अंगलट येण्यासारखे आहे. पवार उद्या त्यातून निसटतीलही. कारण मुलाखतकार राज ठाकरे त्यांना म्हणाले की आपण कधीच कोणाच्या हाताला लागत नाही.
देश स्वातंत्र्य झाल्यापासून आरक्षण हे जातीनिहाय न देता आर्थिक निकषांवर द्यावे असे मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे. आज पवार असं बोलत असेल तर मराठ्यांना आरक्षण द्यावे या मागणीचे समर्थन त्यांनी का केले ? त्यांनी व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला पाठिंबा का दिला ? मराठ्यांचे महामोर्चे निघत असताना त्यामध्ये अजित पवार , सुप्रिया सुळे आदी राष्ट्रवादीचे बडे नेते त्यात सामील का झाले?
एकीकडे आरक्षण आर्थिक निकषांवर द्या व दलित मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका असे म्हणायचे आणि नेमके त्याउलट वागायचे अशी पवारांची भूमिका आहे का ?
आरक्षणाचे हे भूत व्ही. पी. सिंग पंतप्रधान असतांना त्यांनी मंडल आयोग लागू केला तेव्हापासून देशाच्या मानगुटीवर बसले आहे.आयोगाला विरोध करून भाजप सत्तेबाहेर पडला होता. आजही मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही याविषयी शंका आहे.
मराठा आरक्षणाला विरोध असण्याचे कारण नाही. कारण गुजरातमध्येही पटेल (पाटीदार) समाज आरक्षण मागत आहे.तसेच हरियाणा,पंजाबमध्येही जाट व अगदी राजस्थानमध्येही राजपूत समाज आरक्षण मागत आहे.महाराष्ट्रातही धनगर व इतर काही जाती आरक्षण मागत आहे.मग पवारांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचे आजच का आठवले?
आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे असे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचे पूर्वीपासून मतं होते. परंतु त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले.आजही महाराष्ट्रातील अनेक तरुणांना आर्थिक निकषांवरच आरक्षण हवे आहे.सोशल मीडियातून वेळोवेळी अशी भूमिका सातत्याने पुढे येत आहे.त्यात जात पात आणू नये,किंबहुना जात ही कायमची नाहीशी झाली पाहिजे, शाळेतील दाखल्यावरूनही जात काढली पाहिजे अशीच आजच्या तरुण पिढीचे स्पष्ट म्हणणे आहे.परंतु आजच्या राजकारण्यांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष चालविले असून केवळ मतपेटीवर लक्ष ठेवूनच हे केले जात आहे. पवार देखील याच माळेतील असल्याचे स्पष्ट आहे.
आज पवार यांना महाराष्ट्रात जाती-जाती मध्ये वाढत चाललेल्या द्वेषाबाबत चिंता वाटत आहे. आणि ते खरं देखील आहे.मराठा विरुद्ध दलित , बहुजन विरुद्ध ब्राम्हण ,हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन असा जाती-जातीमध्ये मोठा द्वेष वाढत आहे. कोणती ठिणगी कधी पडेल याची भीती वाटत आहे.पण याला जबाबदार कोण? पवार याबाबत बोलत नाहीत.दिल्लीत “स्ट्रॉंग मराठा लीडर” असे त्यांना म्हटले जाते.परंतु महाराष्ट्र हा फुले ,शाहू,आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारांचामहाराष्ट्र व्हावा असं पवारांना वाटत नाही का ?
आज धर्मनिरपेक्ष विचारांची चेष्टा केली जात आहे. आक्रमक संघटना तर अशा विचारांच्या लोकांना गोळ्या घालत आहे. दाभोळकर , पानसरे,कलबुर्गी व गौरी लंकेश त्याचे बळी ठरलेत.अशावेळी राज्यात,देशात जातीय सलोखा जोपासणाऱ्या राज्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. याउलट जाती जातीचा झेंडा हातात घेऊन,तरुणांची माथी भडकविणारे राज्यकर्ते सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत फोफावले आहेत.देशात सर्वात जातीय सलोखा नांदायला हवा.जातीय द्वेष भावना वाढीस लागता कामा नये.शरद पवार आणि राज ठाकरे या दोघांच्या मनात जर खरेच आरक्षण हे आर्थिक निकषांवरच हवे असे असेल तर त्यांनी आता याविषयावर सुरुवातीला राज्य पातळीवर हा प्रयोग राबवावा.त्यासाठी वेळपडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घेण्याची गरज आहे.