नवी दिल्ली -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, ‘परमबीर सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत अनिल देशमुख होम कोरोंटाइन होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता तथ्य राहिलेले नाही, अनिल देशमुख या काळात मुंबईत नव्हते, होम कोरोंटाइन होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
प्रमुख प्रकरणावरुन दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न
‘महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, परमबीर सिंग यांनी जे जे मेन्शन केलेले आहे, वाझे प्रकरणात, त्याबद्दल माझं म्हणणं आहे, मुख्य केस कोणती आहे? अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क करण्याची आहे. मुख्य प्रकरणावरुन दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. आता यावर शरद पवारांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.