मुंबई, दि. २१ सप्टेंबर – राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला अशाप्रकारचे उत्तर देणे दुर्दैवी आहे. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा वाद प्रत्येक ठिकाणी उभा करणे दुर्दैवी आहे. राज्यपालांनी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, पालकत्वाच्या दृष्टीनं भूमिका मांडली आहे. त्यामुळे, राज्यपालांनी केलेल्या सूचना राज्य सरकारने सकारात्मकपणे घ्यायला हव्यात. राज्यापालांनी नमूद केलेल्या सूचने विषयी केंद्राकडे बोट दाखवून दूर पळता येणार नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिली.
साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं सांगत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली होती. परंतु राज्यपालांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी पाठविलेले उत्तर हे राजकीय स्वरुपाचे आहे. दरेकर म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात विनयभंग, अत्याचार, बलात्कार, हत्येच्या घटना हजारोंच्या संख्येनं झाल्या आहेत. त्यातच साकीनाक्याची घटना तर परिसीमा होती. मग अशावेळी राज्यापालांनी, वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी, महिला संघटनांनी मागणी केली असेल, तर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नाही. तसेच हे अधिवेशन केवळ टीका-टिप्पणीसाठी नाही. विरोधकही या विषयात काही चांगल्या सूचना सरकारला सुचवु शकतील. महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था सक्षम होण्यास अजून मदत होईल, या भूमिकेतून याकडे पाहिलं पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी यावेळी ठाकरे सरकारला दिला.