मुंबई-हिंमत असेल तर महाराष्ट्र विधानसभा भंग करून राज्यात निवडणुका घ्या, राज्यातील जनता निवडणुकीसाठी तयार आहे असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी केले आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलेत होते. सध्याचे मुख्यमंत्री हे पार्ट टाईम आहेत. जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाईम मुख्यमंत्री हवा आहे असेही ते पुढे म्हणाले आहेत.
सध्याचे मुख्यमंत्री पार्ट टाईम
महाराष्ट्रात सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. ते कधी झोपतात, कधी उठतात आणि कधी काय करतात हे कुणाला सांगता येत नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक फुलटाईम मुख्यमंत्री हवा आहे. हिंमत असेल तर विधानसभा भंग करून नव्याने निवडणूक घ्या. राज्यातील जनता या निवडणुकीसाठी सज्ज आहे असे आव्हान सीटी रवी यांनी दिले.
महाविकास आघाडीने जनतेला दगा दिला
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून दिले. भाजपला सत्तेत बसवण्याचा कौल जनतेने दिला होता. तरीही त्यावेळी भाजपसोबत युती असणाऱ्या शिवसेनेने जनतेला दगा दिला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून सरकार स्थापित केले. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही असेही सीटी रवी पुढे म्हणाले.भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये महाविकास अघाडी सरकारवर जोरदार हल्ले चढवण्यात आले.