मुंबई -शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या निकालावरून राज्यात भाजपने घोडेबाजार भरवल्याची टीका केली आहे.सुहास कांदेंचं मत बाद का झालं, हा संशोधनाचा विषय असल्याचं संजय राऊत म्हणाले. “नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मतांचा विचारच करत नाही. सुहास कांदेंचं मत का बाद केलं? हा संशोधनाचा विषय आहे. आम्ही त्याच कारणासाठी मुनगंटीवारांच्या मताला आक्षेप घेतला होता. मतदानावेळी धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं हे माहिती असूनही अमरावतीचे एक शहाणे जे उद्योग करत होते, ते आक्षेपार्ह होतं. त्यांचंही मत घटनेनुसार बाद व्हायला हवं. पण फक्त आमचं मत बाद करून रात्री उशीरा आणि पहाटे काही गोष्टी करण्यात आल्या. यांना पापकृत्य करण्याची पहाटेची फार सवय आहे. पहाटेपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरू होता. त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच उपक्रम करत राहा. महाराष्ट्राचा एकदा कायमचा घोडेबाजार करून टाका”, असं राऊत म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना पुढे ते म्हणाले की, राज्यसभेची निवडणुकीची प्रक्रिया ही फारच किचकट आहे. ज्या कारणासाठी आमचं म्हणजे शिवसेनेचं एक मत बाद केलं, त्याच प्रकारची चूक समोरच्यांनी (भाजप) केली होती, पण त्यांचं मत बाद नाही झालं. कुणाला पडलेलं मत बाद झालं हे शोधायला सात तास लागले. या देशातील केंद्रीय यंत्रणा या सत्ताधारी पक्षासाठी कशा प्रकारे काम करतात हे आम्ही काल डोळ्याने पाहत होतो.
राऊत पुढे म्हणाले की, कुठे ईडी, कुठे सीबीआय वापरली जाते, आणि कुठे अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा वापरली जाते का, अशा प्रकारची शंका आता येऊ लागली आहे. त्यांनी फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला असं नाही. 33 मते पहिल्या पसंतीची मते आम्हाला, तर 27 पहिल्या पसंतीची मते महाडिकांना मिळाली. तसं म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. पण निवडणूक प्रक्रियेत पहिल्या-दुसऱ्या पसंतीच्या मतांवरून गणित ठरत असते. काही घोडे बाजारात असतात, जास्त बोली लागली किंवा इतर काही कारणे असतील, त्यामुळे 6 मते आम्हाला मिळाली नाहीत. असे लोकं कुणाचेही नसतात. पण महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना असेल, बच्चू कडू असतील, गडाख असतील आमचे एकही मत फुटले नाही.
ज्यांनी आम्हाला मत दिलं नाही, त्यांची नावं आमच्याकडे
आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलो नाही, आम्ही व्यापार केला नाही, तरीही आम्हाला 33 मते मिळाली यातच आमचा विजय आहे. अर्थात ज्यांनी आम्हाला मतं दिली नाहीत, त्यांची आमच्याकडे नावं आहेत, एवढंच मी सांगेन, असा इशाराही राऊतांनी दिला. हितेंद्र ठाकूरांची 3 मते, संजय मामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार यांनी मविआला मते दिली नसल्याचे संजय राऊत यांनी पत्रकारांसमोर सांगितले.