भाजपाचे ट्वीट ‘यह तो झांकी है…. मुंबई महापालिका अभी बाकी है…!
मुंबई -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत . काल ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील एका हॉटेलात भाजपच्या आमदारांची बैठकही झाली .
उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजप आणि अपक्ष आमदारांसोबत उपस्थित फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला. गुरुवारी, भाजप सर्वात मोठा पक्ष (106) असल्याने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा करेल याआधी भाजप आणि शिंदे गटाचे 39 आणि 11 अपक्ष आमदारांचीही बैठक होऊ शकते. बहुमतासाठी 144 आमदारांची गरज आहे. भाजपला 156 आमदारांचा पाठिंबा आहे. फडणवीस 3 जुलै रोजी शपथ घेतील असे बोलले जाते आहे.
आता राज्यपालांची भेट घेणे ,सत्ता स्थापनेचा दावा करत शपथविधीची वेळ तारीख ठरविणे ,निश्चित करणे बाकी आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार आज गोयातच असल्याचे सांगण्यात येत होते . या बंडखोर आमदारांपैकी कुणाकुणाला कोणकोणती मंत्रिपदे द्यायची यावर हि अधिकृत भाष्य अद्याप झालेले नाही .बंडखोर शिवसेनेतच आहोत असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात त्यांना वेगळा गत स्थापन करावा लागणार ? कि अन्य पक्षात विलीन व्हावे लागणार ? या प्रश्नांवर देखील अद्याप काही निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही .
दरम्यान काल रात्रीच भाजपाने ट्वीट करत आता यापुढे महापालिका काबीज करण्याकडे ही लक्ष्य वेधले आहे
यह तो झांकी है…. मुंबई महापालिका अभी बाकी है…! असं ट्वीट मुंबई भाजपाने केले आहे. सोबतच विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांचा हातात बॅट घेतलेला फोटोही शेअर करण्यात आला आहे. भाजपा मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा सामना खेळायला तयार असून आम्हीच विजयी होणार, कदाचित असा इशारा भाजपाला शिवसेनेला द्यायचा असेल. बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वात श्रीमंत आणि मोठी महानगरपालिका आहे. मुंबई पालिकेवर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व आहे. मुंबई महानगरपालिका शिवसेनेची मोठी ताकद मानली जाते. येत्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. शिवसेनेसोबत भाजपानेही या निवडणुकीसाठी कंबर कसल्याची दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर भाजपाने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.