मुख्यमंत्री शिंदे सर्वगुणसंपन्न, मग एकच सार्वजनिक रस्ते बांधकाम खाते का दिले ? अजित पवार
मुंबई- आज शिंदे-फडणवीस सरकारचे बहुमत सिद्ध झाल्यावर त्यांच्या अभिनंदनपर भाषण करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार घणाघात करत राष्ट्रवादीवरील आरोपांचेही खंडन केले.ते म्हणाले,’ “देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी बारकाईने ऐकलं. तुम्ही एकनाथ शिंदेंचं इतकं समर्थन करत होता. मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रीमंडळात होते, तेव्हा फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं. नेता मोठा असेल तर खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील यांना ते माहिती आहे. ज्याचं वजन असतं, भारदस्त असतो त्याच्याकडे अधिक खाती असतात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अनेक खाती होती.केवळ ४० आमदार असलेल्या नेत्याला १२४ आमदार असलेल्या भाजपाने मुख्यंत्री पद देणे यात निश्चित काही काळेबेरे आहे ,कधी तरी उघड होईलच हे माझे वाक्य लिहून घ्या किंवा लक्षात असू द्यात असेही त्यांनी जाणीवपूर्वक नमूद केले .
ते म्हणाले,’ राज्यपाल आताच अॅक्शन मोडमध्ये कसे आले, संदीपान भुमरेंना मिरच्या का झोंबल्या, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. काय बापू आपण एकत्र काम केले, पण काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…हे वाक्य उच्चारून आमदार शहाजीबापूंना चिमटाही काढला.सुरत -गुवाहाटी -गोवा करत बंडखोर आमदारांनी डान्स केला, टेबलावर चढूनही पण हे बरोबर नाही सत्ता येते जाते. आपण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो हे लक्षात ठेवायला हवे.शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना पद सोडावे लागले. यापूर्वीही भुजबळ, राणेमुळे शिवसेना फुटली पण त्यांच्याबरोबर शिवसेनेशी बंडखोरी करणारे आमदार पुन्हा निवडून आले नाही .हे लक्षात घ्या .अजित पवार म्हणाले, देवेंद्र यांना भाषण करताना मी पाहिले पण आज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह दिसत नव्हता. आधी भाषण करायचे तेव्हा पीनड्राॅप सायलेन्ट असायचा आज मात्र तसे नव्हते असा टोला अजित पवारांनी लगावला.देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान असतील कारण ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते पदही भोगले आहे. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत हे फडणवीसच नव्हे सगळेच सत्ताधारी म्हणतात हे सारखे -सारखे म्हणतात ते का? असा टोलाही एकनाथ शिंदेंना त्यांनी लगावला
अजित पवार म्हणाले, राज्याच्या तेरा कोटी जनतेचे मुख्यमंत्री शिंदे तूम्ही झाले आहात. आता कितीही काही झाले तरी तूम्हाला बाळासाहेब ठाकरेंना दैवत आहे हे सांगतच पूढे जावे लागेल पण माझा अनूभव आहे की, शिवसेनेतून नेता गेला तरी शिवसैनिक जात नाही हे लक्षात ठेवा असे सांगत त्यांना एकप्रकारे इशाराच दिला.
शिवसेनेसोबत राहून भाजप वाढला
अजित पवार म्हणाले, “मला एकनाथ शिंदे यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. भाजपाची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून भाजपाने शिवसेनेच्या मदतीने टप्प्याटप्प्याने पक्ष वाढवत नेला. १९८० ला भाजपाचे १४ आमदार होते. १९८५ ला १६ झाले, १९९० ला १६ वरून ४२ झाले. १९९५ ला ६६ झाले, १९९९ ला परत ५६ झाले, २००४ ला ५४, २००९ ला ४६, २०१४ ला भाजपाचे १२२ आमदार आले. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. २०१९ मध्ये आता १०५ आमदार निवडून आले.”
शिंदेंचा आरोप खोडला
अजित पवार म्हणाले, आजपर्यंत मी कुणालाही फोडले नाही, पण भाजपसोबत एकनाथ शिंदे गेले आणि त्यानंतर राष्ट्रवादीविरुद्ध पाढा वाचला गेला. पण मी निधीवाटपात कोणताही भेदभाव केला नाही. सर्वांनाच मी निधी दिला. दादा भूसे असो की, उदय सावंत कुणातही अंतर पडू दिले नाही, ज्या पद्धतीने शिंदे-बंडखोरांसह काँग्रेसनेही आमच्यावर आरोप केला पण शिंदे जे आरोप करतात तो खोटा आहे. लोकांनी आमच्यावर झालेला आरोप मनातून काढावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले, “मी आजपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना कुणाला बोललो नव्हतो. मात्र, आज मला सांगायचं आहे की भाजपासोबत गेल्यावर महाविकासआघाडी अनैसर्गिक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला असा पाढा वाचण्याचं काम केलं. वास्तविक देवेंद्र फडणवीस व भाजपाच्या इतर सर्व नेत्यांना माहिती आहे की मी काम करताना असा भेदभाव सहसा करत नाही. मी अर्थमंत्री असताना १ कोटी आमदार निधी मी २ कोटी केला. आघाडी सरकार आल्यावर ३ कोटी केला. दुसऱ्या वर्षी ४ कोटी, आता ५ कोटी केला. अजिबात भेदभाव केला नाही.
उद्धव ठाकरेंना विश्वासात घ्यायला हवे होते
अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेऊन जे काही केले असते त्यातून सर्वांना समाधान लाभले असते. आमचे सत्तेला सहकार्य असेल पण जिथे राज्याचे हित पाळले जाणार नाही तेव्हा आम्ही विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणुून देऊ. राजकीय मते, भूमिका वेगळी असू शकते पण राज्याच्या विकासासाठी आम्ही आमची भूमिका पार पाडण्यासाठी कुठेच कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो असेही पवार म्हणाले.