मुंबई-
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले. सीबीआयला यासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर अडचणीत सापडलेल्या अनिक देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या गृहमंत्री पदाची माळ राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या गळ्यात पडली आहे. दिलीप वळसे पाटलांकडे सध्या उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे, पण गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आली आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी कामगार कल्याण आणि उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा विभागासारखे अशा महत्त्वाच्या मंत्रीपदांची जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची माहिती दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुखांनीच पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवारांनी होकार दिला. यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला आहे, असे मलिक यांनी सांगितले. तसेच, सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणे योग्य नसल्याचे सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे मलिक यांनी सांगितले.
सीबीआयने 15 दिवसांत प्राथमिक तपास करावा
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लागलेल्या गंभीर आरोपांचा CBI ने 15 दिवसांत प्राथमिक तपास करावा. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर डॉ. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई हायकोर्टाने सोमवारी हे आदेश जारी केले. आरोप थेट गृहमंत्र्यांवर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाची निःपक्ष चौकशी होऊ शकत नाही असेही कोर्टाने म्हटले आहे.