‘आर्यांचे आक्रमण :
अगा जे घडलेची नाही ! ‘ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे :
‘आर्यांचे आक्रमण :
अगा जे घडलेची नाही ! ‘ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार ,दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुण्यात झाले.विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या मराठी प्रकाशन विभागातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.मिशेल डॅनिनो या फ्रेंच-भारतीय लेखकाच्या पुस्तकाचा सुहासिनी देशपांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हा कार्यक्रम भारत इतिहास संशोधक मंडळात ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते आणि माजी खासदार तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट,अनुवादक सुहासिनी देशपांडे, शैलेंद्र बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दीप्ती खरे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बोलताना डॉ. गो. बं.देगलूरकर म्हणाले, ‘ आर्यावर अनेकांवर संशोधन केले आहे. भारताला इतिहासच नाही, असे पाश्चिमात्य विद्वान समजत असत. आपल्यात न्यूनगंड पसरविण्याचा प्रयत्न झाला.सरस्वती नदीच्या काठी प्रगत मानवी संस्कृती होती. ही सरस्वती संस्कृती आहे, असे आपण म्हटले पाहिजे.मिशेल डॅनिनो यांनी त्यांच्या लिखाणात या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. आपले वैभव आपल्या संस्कृतीत आहे.
भारतीय संस्कृती खंडीत झाली नाही. त्याबाबत आपण जागरूक असले पाहिजे. हिंदू धर्माचे मोठेपण स्वामी विवेकानंदांनी जगासमोर मांडले , हे अतुलनीय आहे.आर्य हा वंश नाहि,संस्कृती आहे. त्या दृष्टीने हा अनुवाद महत्वाचा आहे. शालेय अभ्यासक्रमात अवांतर वाचनासाठी हा अनुवाद लावला पाहिजे ‘.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रदीप रावत म्हणाले, ‘ आर्य भारतात बाहेरून आले, ही मांडणी मॅक्समुलरपासून सुरू झाली. इतिहास काळ सुरू झाल्यापासून भारतात जी संस्कृती आहे ,तिचे अस्तित्व महत्वाचे आहे. आर्य, अनार्य म्हणण्यापेक्षा भारतात जे आहेत, ते हिंदू आहेत, असेच म्हटले पाहिजे.वेदांपासून, सिंधू -सरस्वती ची उत्खनने हे पुरावे आहेत. आपल्याला प्राचीन वारसा मिळालेला आहे.
आपल्यात काही दोष होते, ते टाकून दिले आहेत.आज प्रबोधन युगात हिंदुंच्या पुनरुत्थानाची प्रक्रिया सुरू आहे. हिंदू समाज कात टाकत आहे, असेही रावत म्हणाले.
अभय बापट म्हणाले, ‘आर्य बाहेरून आलेले नाहीत.विद्रोही मंडळींच्या या संकल्पनेवर घाव संशोधकांनी घातलेले आहेत. आपण सर्व इथलेच आहोत, हीच समरसता आहे. विवेकानंदांना समरस,बलवान समाज अपेक्षित आहे .समाजात सर्वत्र यावर चर्चा झाली पाहिजे’.
सुधीर जोगळेकर यांनी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मराठी प्रकाशन विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.
सुहासिनी देशपांडे म्हणाल्या, ‘मिशेल डॅनिनो यांची ही शोधयात्रा या पुस्तकाद्वारे मराठीत आली आहे.ज्यांना धर्मांतरण करायचे होते, त्यांनी आर्य हे बाहेरून आले, असा भ्रम केला. आर्य हे विशेषण आहे. आर्य विरुद्ध द्रविड हा वाद ब्रिटिशांनी सुरू केला.आपण बाहेरून आलेलो नाही, हे पुढील पिढयांना सांगण्याची गरज आहे