ओतुर – दि.५ ( संजोक काळदंते )
ओतुर पोलिस स्टेशन यांचे वतीने आगामी सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरम साजरा करण्याचे अनुषंगाने पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते, शांतता कमिटी मेंबर,हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती,पोलीस पाटील यांची बैठक बुधवारी (५ सप्टेंबर) पार्वती मंगल कार्यालय येथे शांततेत पार पडली.
सदर बैठकीत जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती दिपाली खन्ना यांनी जमलेल्या गणेश मंडळ अध्यक्ष,प्रतिनिधी,कार्यकर्ते यांना गणेशोत्सव आणि मोहरम उत्सवादरम्यान नियम व अटी समजुन सांगितल्या तसेच सुचना दिल्या.
यावेळी ओतुरचे सरपंच बाळासाहेब घुले,मढचे सरपंच महेंद्र सदाकाळ,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे,कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे,रामदास तांबे,संदेश येरंडे,हाजी चाँदमिया मोमीन,मौलाना हलीम, विपुल काळे, सरदार नवले,निलेश महाले, पोलिस उपनिरिक्षक प्रशांत यम्मेवार,पोलिस कॉंस्टेबल के.एम.पाटोळे,विकास गोसावी,महिला पोलिस पाटील उपस्थित होत्या.
यावेळी ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना बॕच वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतेवेळी पोलीस उपनिरीक्षक सुरज बनसोडे यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपणाला डॉल्बी मुक्त, प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव साजरा करायचा असुन, ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
जमलेल्या माण्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आम्ही सर्व सण उत्सव हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरा करत आहोत आणि यावर्षीही आम्ही गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
गणेशोत्सव व मोहरम साजरा करताना आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही ग्वाही देतो. गणपती मिरवणुकीच्या वेळी काही गणपती मंडळे वेळेचे बंधन पाळत नाहीत. त्यामुळे मिरवणुकीस उशीर होतो. आणि त्यामुळे सर्व मंडळांना चौकात वाद्य वाजविण्यास मिळत नाहीत याकरिता वेळेचे बंधन घालुन द्यावे.
वीज विभागाने लाईट जाऊ नये. याबाबत काळजी घ्यावी. गणेशोत्सव मंडळांना तातडीने वीज मीटर देण्यात यावेत. विसर्जन घाटात गणपती विसर्जनाच्या वेळी वीज दिवे लावण्यात यावेत. विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत आरोग्य विभागाद्वारे स्वच्छता,फवारणी करण्यात यावी अशा सुचना जमलेल्या मान्यवरांमधुन करण्यात आल्या.
ओतुरचे सरपंच बाळासाहेब घुले यांनी सांगितले कि सर्व जाती धर्माचे लोक सर्व सण शांततेत पार पाडत असतात. सण उत्सवात सर्वांनी स्वतःहुन काम केले पाहिजे. पूर्वीपासूनच हिंदू आणि मुस्लिम समाजातील सर्व लोक एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होतात यामुळे जातीय सलोखा राखला जातो.तसेच लवकरच ओतुरमधे ९४ सी.सी.टी.व्ही.कॕमेरे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांनी वरील प्रश्नांचा गोषवारा घेताना सांगितले की, सर्व मंडळातील अध्यक्षांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला पाहिजे. चांगले काम करून दाखवले पाहिजे मंडळांना मार्गदर्शन करतील असे ०५ शांतिदुत नेमा, त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार अशा सूचना त्यांनी दिल्या. गणपती मंडळांनी आपल्या गावाच्या, आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत.गुलालाचा वापर टाळुन शक्यतो फुलांच्या पाकळ्यांचा वापर विसर्जन मिरवणुकीत करावा.विसर्जन घाटात निर्माल्य ठेवण्यासाठी व्यवस्था करावी जेणेकरुन नदीपात्र स्वच्छ राहील.मिरवणुकीत डॉल्बीचा वापर टाळावी जे कोणी डॉल्बी लावतील त्यांना पुढील वर्षी परवानगी देणार नाही. मुलांना अभ्यास करायचा असतो वृद्ध लोक असतात ,त्यांना त्रास होतो. त्यामुळे डॉल्बीबाबत आम्ही स्ट्रिक ॲक्शन घेणार आहोत. सी सी टीव्ही कॅमेरे असतील तर नक्कीच फार मदत होते. प्रत्येक मंडळांनी आपल्या वार्डात सी सी टीव्ही लावण्याचा प्रयत्न करावा. विविध संस्था ट्रॅफिक वार्डनची जबाबदारी घेऊ शकते त्यांना आम्ही ड्रेस देऊ तुम्ही मानधन देऊ शकता. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न मिटू शकतो. गणपती मंडळामध्ये महिलांचा समावेश करा. जेणेकरुन महीलांची छेडछाड होणार नाही.तर रोडरोमीओंवर यापुढील काळात सक्त कारवाई करणार असल्याचे श्रीमती खन्ना यावेळी बोलताना म्हणाल्या. सर्व गणपती मंडळांना वीज पुरवठा होण्याबाबत पूर्तता करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या.त्यांनी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. बैठकीस मोठ्या प्रमाणात मंडळाचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.यावेळी सुत्रसंचलन मंगेश फाकटकर यांनी प्रविण पारखे यांनी आभार मानले.