- ओशो अनुयायांचा निर्धार; ओशो रिसॉर्टमध्ये झालेल्या मॉन्सून फेस्टिवलमध्ये केली निदर्शने.
पुणे : एकीकडे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात होत असताना, ओशो विचारांना संपवू पाहणाऱ्यांविरोधात लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ओशो आश्रमात झालेल्या मॉन्सून फेस्टिवलमध्ये अनुयायांनी पत्रके वाटत या वादाबाबत जागृती केली. ओशो आश्रमाचा ओशो रिसॉर्ट करण्याचा प्रयत्न होत असून, ओशोंचे विचार कायम ठेवण्यासाठी आपण एकत्रित आले पाहिजे, असे आवाहन अनुयायानी केले. ओशो शिष्यांच्या गटाने १३-१५ ऑगस्ट रोजी कोरेगाव पार्कमधील मान्सून फेस्टिव्हलमधील सर्व सहभागींना माहितीपर पत्रक वाटून पुन्हा एकदा निषेध नोंदवला आहे. ओशो आंतरराष्ट्रीय संस्थेच्या व्यवस्थापनाच्या वतीने सुरु असलेल्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश ओशो शिष्यांकडून करण्यात आला.
ओशो आश्रमाचे माजी विश्वस्त स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले, ”गेल्या महिन्यातच भारताच्या विविध भागातून ओशो प्रेमी पुण्यात गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी ओशोंच्या समाधीच्या ठिकाणी एकत्रित सहभागी झाले होते. ओशो व्यवस्थापनाने सुरुवातीला बंदी घालत शिष्याना प्रवेश नाकारला होता. नंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना १० मिनिटांसाठी प्रवेश दिला होता. एका महिन्यानंतर, आश्रम व्यवस्थापनाने ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान मान्सून फेस्टिव्हल साजरा करण्याचा निर्णय घेतला. जगभरातील ओशो केंद्रांवर ‘ओशोचा वाढदिवस’ आणि ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करत असताना, ते ओशोंच्या आश्रमात, पुण्यात साजरे केले गेले नाही. ज्या आश्रमात ओशोंनी दहा वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केले आणि त्यांनी त्यांचे प्राणदेखील सोडले. ओशोंशी संबंधित सर्व सण ओशो आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे बहिष्कृत केले गेले आहेत. परंतु नवीन वर्ष आणि मान्सून सण धूमधडाक्यात साजरे केले जातात हे दुःखद आहे. ओशो आंतरराष्ट्रीय संस्थेने ओशो रूढी आणि परंपरेला विरोध करणारे होते. अशी त्यांची ओळख केलेली आहे. संस्थेने त्यांचा हेतू स्पष्ट करण्यासाठी हे एक उत्कृष्ट उदाहरण सर्वाना दिले आहे. या सर्व घडामोडींना १० डिसेंबर २००२ च्या न्यूयॉर्क टाइम्सच्या आवृत्तीत ‘डी-ओशोलायझेशन’ म्हटले होते.”
ओशोंचे अनुयायी स्वामी चेतन अरुप म्हणाले, ”आत्माच्या स्वातंत्र्याशिवाय केवळ शारीरिक स्वातंत्र्याला फारसे महत्त्व नाही. आम्ही महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो की आमच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ ते अनुच्छेद २८ आम्हाला धर्मस्वातंत्र्य देते. म्हणजे आम्हाला आमच्या धर्माचे मुक्तपणे पालन करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. दुर्दैवाने, आम्हाला हेच अधिकार नाकारले जात आहेत. ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन (ओआयएफ) ओशोंच्या समाधीचे अस्तित्व नाकारत असून, या स्थळाला ‘चुआंगत्झू हॉल’ म्हणण्याचा आग्रह धरत आहेत. २०१२ मध्ये धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्यासमोर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ओशोंच्या समाधीचे अस्तित्व नाकारण्यात आले आहे. ओशो आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने त्यांच्या शिष्यांबाबत एक चुकीचे चित्र उभे केले जात आहे. संस्थेच्या वतीने या पवित्रस्थानाची बदनामी करून पद्धतशीरपणे येथील कायदेशीर अडथळे दूर करण्याचे काम केले जात असून या जागेची विक्री करण्याचा घाट घालण्यात येत आहे.”