श्री रामजी संस्थान तुळशीबागेच्या वतीने ‘स्वरफुले’ या भक्तीगीते व अभंगाच्या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’…’जय अंबे जगदंबे सकलांची माता’…रामाला केलेली प्रार्थना ‘कल्याणकारी रामराया देवराया’…’आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’…’माझी रेणुका माऊली’…’रसिकांच्या मनावर शब्दसुरांची छाप उमटविणारे ‘जेथोनि उद्गार, प्रसवे ओंकार, तोचि हा श्रीधरू गोकुळीं वसे’… अशी भक्तीची स्वरफुले आपल्या सुमधुर आवाजातून उधळत गायकांनी तुळशीबाग राम मंदिराचा परिसर भक्तिमय केला.
श्री रामजी संस्थान तुळशीबागेच्या वतीने ‘स्वरफुले’ या भक्तीगीते व अभंगाच्या कार्यक्रमाचे आयोजन तुळशीबागेतील राम मंदिरात करण्यात आले होते. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. यावेळी गायिका डॉ.राजश्री महाजनी, आसावरी असेरकर, माधुरी करंबेळकर यांनी गायन केले. साहिल पुंडलिक (हार्मोनियम), योगेश देशपांडे (तबला), मुकुंद जोशी (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. गजानन महाजनी यांनी निवेदन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विविध रागातील रागमालाने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित भिमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘राम का गुणगान करिये’ या गीताने झाली. ‘जय अंबिके’ या देवीच्या विविध रूपांचे आणि शक्तीचे वर्णन करणाऱ्या गीतातून देवीचे माहात्म्य सांगण्यात आले.
‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’…संत तुलसीदास रचित ‘श्री रामचंद्र कृपालू भजुमन’… ‘माझी रेणुका माऊली’… प्रभुरामचंद्रांचे सोज्वळ रूप दर्शविणारे रागेश्री रागावर आधारित ‘रामचंद्र मन मोहन’… जय अंबे जगदंबे सकलांची माता या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.